उपयुक्ततावाद , उत्तर - व्यवहार वाद , आहार आणि सत्य ३ संस्काराहारी की नि:संस्काराहारी श्रीधर तिळवे नाईक 


व्यवहार वादामध्ये नेहमीच एक प्रश्न उपस्थित होतो आणि तो प्रश्न असतो प्रोसेसचा ! म्हणजे सायन्सचा विचार करताना सायंटिफिक प्रोसेस म्हणजे काय असा मूलभूत प्रश्न व्यवहारवाद विचारतो तिची मांडणी करतो. आणि नंतर मग साहजिकच या सायंटिफिक प्रोसेसला काही मर्यादा असतात का असा प्रश्न उपस्थित होतो . उत्तराधुनिकतेमध्ये नंतर सायन्सला आव्हान देणारा जो डिस्कोर्स आला त्याला कळत नकळत उत्तर व्यवहारवाद जबाबदार होता. त्यानेच संपूर्ण सायंटिफिक प्रोसेस ही कधीकधी कशी पूर्वग्रहदूषित असते याची मांडणी करायला सुरुवात केली आणि त्यातून अनेक गोष्टी निर्माण झाल्या. विज्ञानाबद्दल शंका निर्माण करण्यामध्ये सायंटिफिक प्रोसेस म्हणजे काय तिला काही मर्यादा आहे की नाही किती खरोखरच संपूर्ण सत्य शोधू शकते या प्रश्नांचा प्रचंड वाटा आहे आणि आजचा जो पोस्ट ट्रूथ डिस्कोर्स उभा राहिलेला आहे त्याला सुद्धा कळत नकळत या सायंटिफिक प्रोसेस म्हणजे काय या मूलभूत प्रश्नाने चालना दिलेली आहे . अर्थातच दुसरा घटक जो जबाबदार आहे तो रसेलपासूनच सुरू होतो आणि कार्ल प्रॉपर ने सायन्स विषयक जे लिखाण केले तेही याला जबाबदार आहे आणि अर्थातच पुढे व्हिटगेस्टाईन! 


आपण करत असलेल्या या मांडणीमुळे पुढे धर्म नावाचा अत्यंत पारंपारिक असा ढोबळ दृष्टिकोन डॉमिनेट होत जाईल याची कल्पना उत्तरव्यवहारवादाला अजिबात आलेली नव्हती नाहीतर त्यांनी आधीच काही सोल्युशन शोधली असती त्यामुळे साहजिकच आता ही जबाबदारी चौथ्या नवतेतल्या विचारवंतांच्यावर पडलेली आहे.


बायस अथवा पूर्वग्रह ही एक वैज्ञानिक संकल्पना आता विचारात घ्यावी लागते याचे कारण माणसाला होणारे ज्ञान आणि खुद्द माणूस यांच्यातला करस्पोंडन्स हा माणसावर कितपत अवलंबून असतो हा निर्माण झालेला प्रश्न होय. भारतामध्ये आपण सुरुवातीपासूनच सांगतो आहे की माया नावाची गोष्ट अस्तित्वात आहे आणि माझे स्वतःचे याबाबतीतले म्हणणे असे की वास्तव उपस्थित असते परंतु त्या वास्तवाचे जे आकलन असते त्या वास्तवाशी जो करस्पॉन्डन्स होतो तो माया असतो. म्हणजेच माया वास्तवच असते आणि तरीही संपूर्ण वास्तव नसते. माया ही नेहमीच पोझिशनल असते . भारतातल्या शैव लोकांना ही गोष्ट नेमकी कशी काय कळली हा एक फार मोठा प्रश्न आहे परंतु भारतामध्ये आचार्य शंकराचा आणि आद्य शंकराचार्यांचा जो फार मोठा वाटा आहे तो ह्या संदर्भातला आहे . आद्य शंकराचार्य यांचा सामाजिक क्षेत्रातला वर्णजातवाद जो खरा आहे की नाही की त्यांच्या नावाने खपवला गेला हा फार मोठा प्रश्न असला तरी मायेच्या संदर्भातली त्यांची मांडणी अतिशय महत्त्वाची ठरत जाते. अर्थातच तत्कालीन काळामध्ये विज्ञान जास्त उपलब्ध नसल्याने त्यांना त्याचा अंदाज संपूर्ण आलेला नाही . मात्र शैवांची माया ही धारणा नेमकी काय आहे हे त्यांना नीट कळले होते किंबहुना त्यांना नंतर जो शंकराचा अवतार मानण्याचा विचार पुढे आला तो यासाठीच आला.शैव यासाठी वापरत असणारा शब्द आहे आदिमाया ! आणि हा प्रामुख्याने शक्तीच्या प्रतीत होणाऱ्या संवेदनशील इंद्रिय शील होणाऱ्या रूपाबद्दलचा शब्द आहे. यातूनच मग माणसाची माया निर्माण होते . याला मनुष्य माया म्हणावे का असा एक मोठा प्रश्न आहे पण आपण त्याला मनुष्य माया म्हणू शकतो. याचे कारण असे की वाघाला प्रतित होणारी माया ही वाघमाया म्हणू शकतो प्रत्येक प्राण्याची माया वेगळी असण्याची शक्यता बरीच आहे . याबाबतीत रंगांच्या विषयी जे संशोधन झालेले आहे ते तरी या क्षणी मायेच्या बाजूने आहे. किंबहुना शैव तत्त्वज्ञानाचा प्रचंड प्रभाव जो 1990 नंतर वाढत चाललेला आहे त्याचे सर्वात मोठे कारण शैव श्रुतीतले अनेक मूलभूत सिद्धांत हे कळत नकळत आता सायंटिफिक बनत चाललेले आहेत. 


आता असे असेल तर मग माया काल्पनिक आहे ही विचार मांडणी कुणी सांगायला सुरुवात केली? तर माया म्हणजे भ्रम किंवा काल्पनिक असे काहीतरी हा सिद्धांत प्रामुख्याने पुरोहित वर्गाने प्रचलित केला. प्रत्यक्षात तो शैव लोकांना तसा अभिप्रेत नाही . पुरोहित लोकांनी हे करण्याचे कारण स्पष्ट होते त्यांना काहीही करून सामान्य जनतेचे लक्ष दैनंदिन जीवनातील वास्तवावरून हटवून त्यातील शोषणावरून हटवून त्याला परलोकावर घेऊन जायचे होते . त्यामुळे एखाद्या शस्त्रासारखा माया सिद्धांत वापरला गेला . पण आता आपण 21व्या शतकात आलेलो आहोत म्हणून आपण या गोष्टीचा नीट विचार करू शकतो. 


माणसाच्या शरीर मर्यादा या सत्य मर्यादा असतात ही एक वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती हळूहळू अधिकाधिक उत्खननित होते आहे . पण त्याचबरोबर हेही खरे की आपली ही मर्यादा कळल्यामुळेच माणूस आपले शरीर अधिक चांगल्या पद्धतीने वाढवत चालला आहे अधिकाधिक चांगल्या टेलिस्कोप तयार करत चालला आहे मायक्रोस्कोप तयार करत चाललेला आहे . किंबहुना मायेची आणि मनुष्य मायेची मर्यादा जितकी कळत जाते तितके वास्तव आणि सत्य तुमच्याजवळ येत जाते. 


एडमंड हुसरले याने जेव्हा हेगेल याची पुरोगामी फिनॉमिनोलॉजी मोडीत काढून आधुनिक फिनॉमिनोलॉजी मांडली तेव्हा इंटेंशन्यालिटीचा हेतूग्रस्ततेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हे हळूहळू स्पष्ट होत गेले . हेतूग्रस्तता आणि पूर्वग्रह दूषितता या दोन गोष्टी माणसाच्या सत्याच्या आणि वास्तवाच्या आकलनाच्या दरम्यान ठामपणे उभे असतात आणि त्या माणसाला टाळता येणे शक्य असते. पण माणूस या गोष्टींच्या संदर्भात पुरेसा सजग होत नाही आणि आश्चर्यकारकरीत्या तो सजग होऊ नये अशीच व्यवस्थांची आणि संरचनांची सहेतुक इच्छा असते. आपले अभ्यासक्रम हे त्या हिशेबाने अत्यंत व्यवस्थित रचले गेलेले असतात. आणि अवस्था अशी होती की आपले हे सर्व अभ्यासक्रम आपल्या मेंदूची ही विचार प्रोसेस सरचित करत जातात. आपण स्वतःच यांचे बाय प्रॉडक्ट बनतो . म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की अभ्यासक्रम म्हणजे राजकीय सत्तांची त्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक सत्तांची हेतूग्रस्तता असते , त्यांनी स्पॉन्सर केलेली पूर्वग्रह दूषितता असते. याचा अर्थ स्पष्ट आहे एकीकडे व्यक्तिगत हेतूग्रस्तता आणि पूर्वग्रह दूषितता आणि दुसरीकडे सामूहिक हेतूग्रस्तता आणि पूर्वग्रहदृष्टीता यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेले असते . संस्कारीत केलेले असते . याचबरोबर काम या अक्षांमधील जी कुल आणि कुटुंब या संदर्भातली नेटवर्किंग सिस्टीम असते ती सुद्धा आपणात या गोष्टी स्पॉन्सर करत असते. म्हणजेच एका अर्थाने आपण संस्काराहारी असतो. 


म्हणजे आपण जर का आहाराचा प्रश्न घेतला तर आपल्या लक्षात येईल की आपण काय खायचे हे आपल्या वैयक्तिक , कामिक , सामूहिक संस्कारग्रस्ततेवर म्हणजेच वैयक्तिक , कामिक , सामूहिक हेतूग्रस्ततेवर आणि पूर्वग्रहदूषिततेवर अवलंबून असते. त्यामुळेच मोक्षाच्या संदर्भामध्ये ऍक्च्युली तुम्ही नेमके काय खात वाढले आहात हे पाहावे लागते. म्हणजे मी जर का जन्माने गोवन gsb असेन तर माझ्यावर मासे खाण्याचे संस्कार आपोआपच होतात माशांच्या बद्दलचे हेतूग्रस्तता आणि पूर्वग्रह दूषितता आपोआपच माझ्यात स्पॉन्सर झालेली असते . मी जर का कोल्हापुरात वाढलो असेल तर आपोआपच पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा यांच्या बद्दलची संस्कारग्रस्तता म्हणजेच हेतूग्रस्तता आणि पूर्वग्रह दूषितता आपोआपच स्पॉन्सर झालेली असते . अशावेळी मोक्षाच्या दिशेने टाकलेले पाऊल हे शाकाहारी की मांसाहारी असे नसते तर संस्काराहारी की नि: संस्काराहारी या दिशेने ठरते कारण खरा प्रश्न नि:संस्कारी कसे व्हायचे हाच असतो . आपल्याकडे तर मुद्दा असा आहे अनेकदा आपली जात आणि वर्ण हे सुद्धा संस्कार करत राहतात. त्यामुळे जैन धर्मातले लोक कुठेही जन्मले तरी ते कट्टर शाकाहारी होत जातात यामध्ये प्रत्यक्ष वास्तवाची आणि सत्याची काहीच भूमिका नसते पण संस्कारांची प्रचंड भूमिका असते. त्यामुळेच मोक्षाच्या यात्रेमध्ये नेहमीच आपल्या हेतूग्रस्ततेचे आणि पूर्वग्रह दूषितपणाचे अत्यंत बारकाईने आत्मनिरीक्षण करावे लागते मगच तुम्हाला आत्मपरीक्षण करता येते स्वतःला लॅबमध्ये नेता येते जिला मी सेल्फ लॅबोरेटरी म्हणतो .


हाच प्रश्न पुढे मग आपण जेव्हा या संपूर्ण वास्तवाचे निरीक्षण आणि परीक्षण करायला जातो तेव्हा निर्माण होतो आणि अनेकदा घडते असे की आपण ज्या विशिष्ट शाखांच्या मध्ये ज्ञान शाखांच्या मध्ये ज्ञानदर्शनांच्या मध्ये वाढलेलं असतो तिथली सगळी हेतूग्रस्तता आणि पूर्वग्रहदूषितता त्यांच्यामुळे तयार झालेली संस्कारग्रस्तता आपण मिरवत असतो गिरवत असतो . अनेकदा ही संस्कारग्रस्तता प्रत्यक्षात संसर्गग्रस्त असते संसर्गग्रस्तता असते. मनुष्य हा प्राणीच असा आहे की तो ताबडतोब संसर्ग लावून घेतो. त्यामुळेच कॉपी करण्याची आणि पेस्ट करण्याची अफाट क्षमता त्याच्यामध्ये आहे . हे कॉपी पेस्टिंग माणसाची कलेक्टिव्हिटी आणि कलेक्टिव्ह उत्क्रांती वाढवत नेते वेगाने प्रसार करत नेते आणि मनुष्य समुदाय म्हणून नेहमीच कळप म्हणून नेहमीच प्रचंड वेगाने पुढे पुढे सरकत जातो. इतर प्राण्यांच्याकडे हा गुण मनुष्याच्या तुलनेत फार कमी आहे आणि अनेकदा माणसाने केवळ या गुणाच्या जीवावर इतर प्राणी जीवांच्यावर मात केलेली आहे. ईश्वर हा सुद्धा एक संस्कार असतो आणि तो संसर्गानेच आलेला असतो . अगदी मोक्ष सुद्धा अनेकदा संस्कार असतो आणि तो संसर्गानेच आलेला असतो (माझे हे सुदैव म्हटले पाहिजे की माझ्या बाबतीत तसे झाले नाही आणि एका शक्तिपाताने आयुष्य बदलले आणि हा शक्तिपात शक्य झाला कारण माझ्या सुदेवाने संस्कारग्रस्तता फार कमी होती अर्थात दुसरे कारण मी इथे सांगत नाही कारण ते सायंटिफिकली सिद्ध करणे शक्य नाही ) 


भारतामध्ये धर्म हा यासंदर्भामध्ये म्हणजेच मोक्षाच्या संदर्भामध्ये एकाच वेळी मित्र आणि शत्रू असे दोन्ही रोल पार पाडतो एका बाजूला तो मोक्षाविषयी ठाम भूमिका घेतो आणि मोक्ष हेच अंतिम उद्दिष्ट सांगतो त्यामुळे तुम्हाला मोक्षाचे संस्कार आपोआपच मिळतात त्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत पण त्याचबरोबर अनेकदा मोक्ष कसा मिळवावा या संदर्भात तो इतके संस्कार देतो की त्या संस्कारातून बाहेर पडणे गरजेचे बनते. विशेषत: आपल्या मोक्षाच्या संदर्भात अनेकदा आपल्यावर भक्ती लादली गेलेली असते . प्रत्यक्षामध्ये जवळजवळ 80 टक्के लोक हे भक्ती बाबत प्रतिकूलत असतात. पण संस्कारग्रस्त तेथून बाहेर न आल्याने त्यांना योग्य ते महातंत्र सापडत नाही आणि ते भेलकांडत राहतात . आपण जर का जुड्याईक धर्माशी याची तुलना केली तर आपली स्थिती मोक्षाच्या संदर्भात केव्हाही सर्वोत्तम आहे हे लक्षात येते. मी नेहमीच म्हणतो की तुम्ही जर का भारतीय धर्मात जन्म घेतलेला असाल तर तुम्ही मोक्षाबाबत सुदैवी आहात . पण जर का धार्मिक संस्कार गरजेपेक्षा अधिक घनदाट झाले असतील तर मात्र यातून काही प्रश्नही निर्माण होतात आणि कधी कधी पाश्चात्य साधकाला याचा फायदा जास्त मिळतो पाश्चात्य साधक हा इतका मोकळा असतो की त्याच्यावर मोक्षाच्या संदर्भात पूर्वग्रह दूषितता आणि हेतूग्रस्तता यांचे पडणारे भारतीय धर्माचे ओझे असत नाही त्याला ते वाहावे लागत नाही मात्र अनेकदा जुड्याइक धर्मातले ओझे जर का घट्ट असेल तर त्याला मूलभूत मोक्षवीचे सत्यच कळत नाही . माझ्या आयुष्यात मी असे अनेक मुस्लिम ख्रिश्चन साधक पाहिलेले आहेत ज्यांना मोक्ष सहज कळतो कारण त्यांचा जन्म भारतात झालेला आहे. 


संस्कारग्रस्ततेमुळेच माया अधिक घनदाट बनत जाते . ही माया प्रत्येक माणसाने स्वतःच तयार केलेली असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे . तिला मी आत्ममाया म्हणतो या आत्ममायेतून मोकळे होणे ही मोक्षाची आद्याट आहे . 


आद्य आणि सद्य या दोन शैव संकल्पना आहेत आणि आपण या दोन्हींचाच फक्त विचार करू शकतो . मात्र भविष्याचा जो विचार असतो तो मात्र अनेकदा माया असतो म्हणूनच आद्य विचार , सद्य विचार आणि माया विचार यांचे अजीबो गरीब नेटवर्क आपल्यामध्ये ऑपरेट होत असते. आद्य शिव आहे शून्य आहे आणि त्याबरोबर मग येणाऱ्या इतिहासाच्या अनेक गोष्टी आहेत. म्हणूनच आपण अनेकदा आद्याला नमस्कार करतो राम या शब्दाचा मूळ अर्थ सुद्धा आद्य आहे कारण तो सुरुवातीचा सूर्य असतो सकाळचा सूर्य असतो म्हणूनच आपल्याकडे रामनवमीला आपण आद्य लिंगाची पूजा करतो पूर्वजांची पूजा करतो आपण कुठे आले आहोत आणि कुठून आलो आहोत याची आठवण करून देणे हा त्या मागचा उद्देश असतो . अर्थातच आता आपणाला डार्विनने अधिक चांगल्या रीतीने हे समजावलेले आहे.


अर्थातच आद्याला नमस्कार करा नका करू हा मुळातच तुमचा मोक्ष साधायचा आहे की नाही यावरचा प्रश्न आहे पण मोक्ष हा जर का तुमचा सिल्याबसचा भाग नसेल तर मग अशा आद्याची पूजा करण्याची काहीच गरज नसते. अनेकदा तर आद्य सोडून द्या प्रथम सद्य काय आहे ते पहा अशी स्थिती येते . साधना म्हणजे सद्याची सध्याची साधना असते सध्या मध्ये उपस्थित राहण्याची साधना असते. आणि ती जी आद्य आहे त्याच्यात जाण्यासाठी असते. 


ज्यांना मोक्ष मिळवायचा आहे त्यांच्यासाठी हे सर्व स्पष्ट असलेच पाहिजे परंतु त्याचबरोबर हेही तितकेच खरे की तुम्ही जर का वैज्ञानिक तंत्र वैज्ञानिक चिन्ह वैज्ञानिक होणार असाल तर तुम्हाला या गोष्टी कळायलाच हव्यात . किंबहुना तत्त्वज्ञानाचे जे मुख्य काम आहे दर्शनाचे जे मुख्य काम आहे ते यासंदर्भातच असते आणि भारतामध्ये अनेकदा वैज्ञानिक हवेतच काम करत राहतात आणि मूलभूत काम होत नाही .


तुमचे क्षेत्र कोणतेही असो हेतूग्रस्तता पूर्वग्रहग्रस्तता यांच्यामुळे तयार होणारी संस्कारग्रस्तता आणि या संस्कार ग्रस्ततेमुळे तुमच्या ठायी दाटलेली मायाग्रस्तता यांच्यातून स्वतःला सतत मुक्त करावे लागते भले तुम्हाला मग मोक्षाची आस असो अगर नसो . ज्याला ज्याला हे वास्तव समजून घ्यायचे आहे त्याच्यासाठी मोक्षाची मटरियालॅस्टिक असेल पण वाटचाल आवश्यकच ठरते त्यासाठी ज्ञानतंत्रातली साधना मग ती मोक्षाच्या दिशेने जावो किंवा जगाच्या दिशेने जावो आवश्यक ठरते. म्हणूनच मी म्हणतो की तुम्ही काही असा भौतिक शास्त्रातले वैज्ञानिक असा , गणित भूमितीतील शास्त्री असा किंवा मग अर्थशास्त्रातले विद्वान असा किंवा कलेतले कलावंत असा मोक्षाला टाळून तुम्हाला जाता येत नाही. कुठल्याही क्षेत्रातली नवता तिथेच शक्य होते जिथे किमान मोक्षाची आद्याक्षरे गिरवली जातात.


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे