सत्य ,व्यवहार वाद आणि उत्तर व्यवहार वाद भाग ११ माया , कला आणि व्यवहार वाद श्रीधर तिळवे नाईक 

आपण सध्या व्यवहाराची चर्चा करत आहोत आणि त्या अंगाने व्यवहारवादाची ! सर्वसाधारणपणे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्यांची दखल व्यवहार वादाला घ्यावी लागली. इंग्लंड मध्ये या काळामध्ये लॉजिकल पॉझिटिव्हिजम ही एक फार मोठी वैचारिक चळवळ होती तिचा आधार इंद्रिय वाद आणि इंद्रियप्रामाण्यवाद होता ज्याची पहिली मांडणी फ्रान्सिस बेकन यांनी केली होती. तर दुसऱ्या बाजूला हेगेलचा विश्वचैतन्यवाद प्रभावित करत होता ज्याची मांडणी बुद्धी प्रामाण्यवाद व भाव प्रामाण्यवाद त्यांच्यावर उभ्या राहिलेल्या हेगेल कडूनच आली होती एका अर्थाने आपल्याला येणारा अनुभव हा इंद्रियांच्यामुळे येतो की आपल्या मनामुळे येतो हा मूलभूतच प्रश्न होता . गणिताचे ज्ञान हे अमूर्त असल्याने साहजिकच ज्यांना गणित कळायचे ते सर्व लोक या काळामध्ये चैतन्य प्रामाण्यवादी होते 

आपल्याकडे मात्र शैव लोकांची माया ही संज्ञा फार लोकप्रिय झालेली आहे मायेचा साधा सरळ अर्थ मांची म्हणजे आईची काया असा होतो पण नंतर याला अनेक मिती प्राप्त झाल्या . पुढे पुढे तर पुरोहित वर्गाने( यात ब्राह्मण आणि गुरव दोघेही येतात) याचा अर्थ भ्रामक असा केला . त्याचे भारतावर अनेक दुष्परिणाम झाले मुख्य म्हणजे या संसाराकडे पाठ करणे हेच मोक्ष मिळवण्याचे साधन ठरले यातून मोक्ष तर मिळाला नाहीच परंतु संसार पण हातातून गेला .


धर्माचा आणि या मायेचा काही संबंध असतो का हा या काळातला सर्वात मोठा प्रश्न आणि त्याचे उत्तर मनप्रामाण्यवादी लोक "नाही" असे देत होते त्यांच्या मते धर्म ही माणसाची मानवी ज्ञानाची निर्मिती आहे त्यामुळे अनुभवाच्या आधारे किंवा इंद्रियांच्या आधारे धर्माची चर्चा करता येणार नाही . प्रश्न असा आहे की धर्म ही जर का एक मानवी संकल्पना असेल तर मग तिची उपयुक्तता काय? की तिचीही उपयुक्तता आपल्याला मनाचे समाधान करणारी गोष्ट अशा तऱ्हेने सिद्ध करावी लागेल ? उपयुक्ततावादाने आणि नंतर व्यवहार वादाने जवळजवळ हीच भूमिका घेतलेली दिसते . यातून पुढे निर्माण होणारे प्रश्न असे आहेत की जर का धर्म ही मनाची गोष्ट असेल तर मग मनाच्या बाहेर असणाऱ्या मायेमध्ये धर्माच्या नावाने व्यवस्था का असावी ? मंदिरे का असावीत ? पुरोहित कशाला हवेत ? आपण मग देवाला नैवेद्य का दाखवावा कारण देव तर तो खाणार नाही आणि देवही मनोनिर्मित गोष्ट असल्यामुळे कधीही नैवेद्य पुढेही खाल्ला जाणार नाही . मग करायचे काय ? तर मी देवाला दाखवलेला नैवेद्य माझ्या मनाला शांती देतो एवढीच उपयुक्तता त्या नैवेद्याची राहते . अर्थात त्यासाठी नैवेद्याला पावित्र्य प्राप्त होणे अत्यंत आवश्यक असते आणि त्यासाठी नैवेद्य सुंदर दिसावा लागतो म्हणजेच धर्मामध्ये सौंदर्य आणि पावित्र्य या दोन गोष्टींचे महत्त्व आहे याचा एक दुष्परिणाम असा होतो की सौंदर्याच्या कसोट्या (उदाहरणार्थ ब्राह्मण पुरोहितांनी तरी स्त्री सौंदर्याचा ठरवलेला गोरा रंग) हा पुरोहित वर्ग ठरवायला लागतो त्याचबरोबर नैवेद्याची पावित्र्यता ही ही पुरोहित वर्ग ठरवायला लागतो सर्वसाधारणपणे शैव-धर्मामध्ये अनेकदा नैवेद्य हा मांसाहारी सुद्धा चालत असल्याने साहजिकच ज्या धर्मांच्या पुरोहित वर्गामध्ये /ने नैवेद्य हा शाकाहारी असला पाहिजे असे ठरवलेले आहे त्यांच्याशी संघर्ष अटळ होतो . इथे मांसाहारी नैवेद्य हा पवित्र आहे की नाही हा वाद आहे . भारतामध्ये प्रथम महावीर यांनी मांसाहारी नैवेद्याला नकार द्यायला सुरुवात केली . हा विचार त्यांच्या अहिंसा या तत्त्वातूनच आलेला आहे याचे कारण असे की मांसाहार हा हिंसा करूनच निर्माण झालेला असतो आणि अशी हिंसा करून निर्माण झालेला नैवेद्य हा पवित्र कसा काय असू शकतो असा प्रश्न अहिंसावाद स्वीकारल्याने जैन लोकांच्या मध्ये निर्माण होतो अगदी मुस्लिम समाजामध्ये बकरी ईदला बकरी ही पवित्र असते असेच मानले जाते . जिथे सर्वसाधारणपणे शाकाहार हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसतो उदाहरणार्थ वाळवंट तिथे मांसाहार हाच मुख्य आहार असल्याने देवाला सुद्धा तोच दाखवला जाणे अटळ असते . प्रश्न असा येतो जेव्हा तुम्ही भारतासारख्या शाखाहार प्रचंड उपलब्ध असलेल्या देशांमध्ये येता तिथे आहाराचे तत्त्वज्ञान बदलणार आहात का? तर ते बदलले जात नाही साहजिकच नैवेद्य सुद्धा मांसाहारीच राहतो . यातून हिंसेला उत्तेजन देणारा नैवेद्य ठेवावा की नाही असा मूलभूतच प्रश्न निर्माण होतो. दुसरी गोष्ट शैव-धर्मामध्ये असे काय झाले की तिथे मांसाहार नैवेद्य म्हणून चालायला लागला ? याही प्रश्नाचे उत्तर पुन्हा एकदा आपल्याला पशुपालन कालखंडामध्ये घेऊन जाते . शैव धर्म हा अति प्राचीन आहे हे मी नेहमीच सांगतो त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शाकाहार प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण होण्यासाठी मुळात शेती प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्तित्वात यावी लागते . महावीर आणि बुद्ध यांच्या काळामध्ये शेती भरपूर झाली आणि म्हणूनच शाकाहार हा नैवेद्य म्हणून येण्याच्या शक्यता अधिक वाढत गेल्या . शैव हा पशुपालन कालखंडामध्ये जन्मल्याने साहजिकच तिथे पशु हाच मुख्य आहार होता . साहजिकच तोच देवाला दाखवला गेला विशेषता देवीला ! माया म्हणजेच मातेच्या अंगाला अंगच नैवेद्य म्हणून दाखवावे असा हा प्रकार होता. आता काळ बदलल्याने शैव लोकांनी आपल्या नैवेद्यात बदल करावा आणि शाकाहार स्वीकारावा असे मी नेहमीच सांगत असतो. पण याबाबतीत सक्ती असू नये असाही माझा आग्रह आहे . मातेला जगदंबेला शाखाहार की मांसाहार हा प्रश्न पडत नाही त्यामुळे तिला शाकाहार चालतो . जेव्हा कसल्याच प्रकारची शाकाहाराची शक्यता नसते तेव्हा मात्र अवश्य मांसाहार करावा आणि मांसाहाराचा नैवेद्य सुद्धा चालू शकतो पण मुळात खरोखर अशी स्थिती आहे का हे पहावे एकेकाळी मांसाहार हा खूप स्वस्त होता आणि जंगलात जाऊन शिकार करून तो सहज मिळवता येत होता आता मात्र अशी स्थिती राहिलेली नाही हळू हळू मांसाहार हे महागडे प्रकरण बनत चाललेले आहे अशावेळी गरीब लोकांच्यावर त्यांनी मांसाहारच नैवेद्य म्हणून दाखवला पाहिजे अशी सक्ती करणे मला चुकीचे वाटते. 


मांसाहारामध्ये अनेकदा खटकणारी एक गोष्ट ही सौंदर्यशी निगडित आहे एखादा बकरा कापला जातो तेव्हा ती काही फार सौंदर्यपूर्ण घटना असते असे म्हणता येत नाही . एक विशिष्ट प्रकारची क्रूरता या घटने मधले सौंदर्य पाहण्यासाठी तुमच्याजवळ असावी लागते . त्या उलट शाकाहारी नैवेद्य हा सौंदर्यपूर्ण दिसतो . आणि मुख्य म्हणजे त्याचे दाखवणे सौंदर्यपूर्ण असते . काटण्याआधी बकरा किंवा कधी कधी रेडा म्हैस सुंदरच असतो परंतु त्याचे काटणे ही प्रक्रिया सौंदर्यपूर्ण आहे का असा हा प्रश्न आहे . मला तरी व्यक्तिशः कधीही हे सौंदर्यपूर्ण वाटलेले नाही उलट एक जीव जातो असाच फील येतो हा फील हिंसेला धरून असतो आणि मोक्षाच्या यात्रेमध्ये अनेकदा बाधा बनू शकतो . निदान माझ्या बाबतीत तरी तो बनला आणि मी बळी चढवणे बघणे बंद केले . शक्य होईल तिथे थांबवले . लोकांच्या श्रद्धांचा आदर करावा लागतो पण त्याचबरोबर लोकांना सत्य सांगणे गरजेचे असते . पण यातून एक वेगळीच मूल्य व्यवस्था तयार होते . म्हणजे शाकाहार करणारे हे धार्मिक पातळीवर किंवा आध्यात्मिक पातळीवर उच्च स्थानी आहेत असा भेदाभेद करणारा विचार उदयाला येतो . माझ्या मते हा विचार चुकीचा आहे . याबाबतीत विवेक दाखवणे खूप गरजेचे आहे पण दुर्दैवाने विवेकच हरवत चालला आहे . केवळ प्रथा चालत आली म्हणून रेडा कापला पाहिजे किंवा म्हस कापली पाहिजे हे सुद्धा चुकीचेच आहे . त्याबाबतीत विवेक काय सांगतो हे फार महत्त्वाचे निदान माझा विवेक मला असे सांगतो की आता नैवेद्य आणि बळी यांच्या नावाखाली होणारी हिंसा थांबवावी .


धर्माच्या केंद्रस्थानी कल्पनाशक्ती असते आणि अनेकदा धर्म जे सादर करतो ते वास्तव म्हणून कल्पनानिर्मित प्रतिकात्मक वास्तव असते असे म्हणता येईल. साहजिकच मग या प्रतीकात्मक वास्तवाचे करायचे काय असा प्रश्न निर्माण होतो आणि त्यातूनच मग धर्म संघर्ष निर्माण होतो उदाहरणार्थ मूर्ती ही प्रतीकात्मक वास्तव असते परंतु इस्लाम मध्ये हे प्रतिकात्मक वास्तव स्वीकारले जात नाही उलट ती काफिरी ठरते साहजिकच मग इस्लामच्या नावाने मूर्तीफोड सुरू होते आता गंमत अशी असते की काबा हे प्रतीकात्मक वास्तव म्हणून चालते पण मूर्ती मात्र चालत नाही . वास्तविक दोन्ही ठिकाणी कल्पनाशक्तीच व्यक्त झालेली आहे मग तुझी कल्पनाशक्ती ही माझ्या कल्पनाशक्ती पेक्षा अधिक चांगली हे कोण ठरवणार ? उलट एकच एक प्रतिकात्मक वास्तव स्वीकारणे हे सौंदर्यावर मर्यादा घालते . सौंदर्यांच्या सर्व शक्यता लोप पावतात . कल्पना करा की जर का अशी आज्ञा दिली असती की कोणीही कुठेही काबा बांधू शकतो तर जगात किती नवीन वेगवेगळी सौंदर्यपूर्ण आणि पवित्र अशी स्थळी निर्माण झाली असती ? असो. भारतीय इस्लामने यावर दर्गा हा उपाय काढलेला आहे आणि तोही सौंदर्यपूर्ण आणि पावित्र्यपूर्ण आहे . आता अर्थात कट्टर इस्लामिक मुसलमानांना हे अमान्य आहे पण त्यातून मग वेगळा प्रश्न निर्माण होतो इस्लामने स्वतःच्या बाबतीत स्वतःच्या धर्माबाबतीत हा धर्म निर्णय घेतला हे ठीक आहे पण दुसऱ्यांच्या धर्माबाबत निर्णय करण्याचा अधिकार इस्लामला कोणी दिला ? तुम्हाला मूर्ती पूजा मान्य नाही तर तुम्ही मूर्ती पूजा करू नका पण इतर धर्मातल्या लोकांनी पण मूर्ती पूजा करू नये हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आणि जर का तुमच्या धर्माने हा तुम्हाला अधिकार दिला असेल तर आमच्या धर्माने उद्या उलट आज्ञा दिली की जे मूर्ती पूजा करत नाहीत ते काफीर तर तुम्ही कसे react करणार आहात. इस्लाम या संदर्भातला इतर धर्मांच्या मधला निर्णय स्वतःच्या ताब्यात घेतो आणि स्वतःच निर्णय करतो हा दुसऱ्यांच्या धर्मात असलेला हस्तक्षेप असतो आता तो इतर धर्मीय लोकांनी का सहन करावा ? तुमच्या धर्मातल्या सौंदर्याच्या आणि पावित्र्याच्या कल्पना आम्ही ठरवणार असा अट्टाहास आहे आणि तो स्वीकारणे आता इतरांना शक्य होत नाही याबाबतीत इस्लामला स्वतःला बदलावे लागेल .


कलेमध्ये सर्वसाधारणपणे धर्मप्रदान धर्मप्रधान कला ही नेहमीच प्रतिकात्मक कला असते साहजिकच धर्माने निर्माण केलेले वास्तव जे काल्पनिक असते ते प्रमाण मानण्याकडे कलावंतांचा आणि रसिकांचा कल असतो . मानवी जीवनामध्ये धर्म महत्त्वाचे बनण्याचे सर्वात मोठे कारण कला आहे . कलेनेच धर्म वाढवला आणि जतन केला. त्यामुळे शेवटी नाइलाजाने गौतम बुद्ध यांनी कला ही धम्माची शत्रू मानली . प्रत्यक्षात बौद्ध लोकांनी काही ही गौतम बुद्धाची ही गोष्ट स्वीकारलेली दिसत नाही म्हणजे जितक्या प्रामाणिकपणाने आणि तळमळीने मुस्लिम लोकांनी मूर्तिपूजा नाकारली तितक्या तळमळीने बौद्ध लोकांनी काही कला नाकारलेली नाही . महायान आणि आदियान यांच्यात जो काही महत्त्वाचा फरक पडला आहे तो कला या मुद्द्यावर सुद्धा पडलेला आहे . महायान हे मुख्यतः शैव लोकांनी जन्माला घातलेले बौद्ध धर्माचे स्वरूप आहे आणि शैवांच्या मते कला ही मोक्ष देऊ शकत असल्याने आणि नटराज हे अतिशय महत्त्वाचे त्यांचे दैवत असल्याने साहजिकच त्यांनी बौद्ध धर्मामध्ये कला आणली आणि ती केवळ आली नाही प्रचंड भरभराट पावली . आता इथे मूर्ती ही पवित्र आणि सुंदर असते ही संकल्पना आहे साहजिकच तीच्यातून भीतीचित्रे सुद्धा निर्माण झाली जी आपणाला सर्वत्र दिसतात .


चित्रकलेला विरोध हा काही प्रथम मुस्लिम लोकांनी केलेला नाही तो प्रथम गौतम बुद्धाने केला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे . पण आश्चर्यकारकरीत्या घर ही एक अत्यंत आवश्यक गोष्ट असल्याने मोहम्मद पैगंबर स्थापत्य कलेला नकार देऊ शकलेले नाहीत साहजिकच जिथे जिथे मुस्लिम राजवटी आल्या तिथे स्थापत्य कलेची प्रचंड भरभराट झालेली दिसते . कारण मुस्लिम धर्मात ती गोष्ट पवित्र आहे . मुळात मशिद हेच स्थापत्य असल्याने स्थापत्य कलेला नकार देणे ना प्रेषितांना शक्य झाले ना त्यांच्या अनुयायांना ! गौतम बुद्ध यांच्या बाबतीत सुद्धा हेच झालेले दिसते कारण संघाच्या सदस्यांसाठी विहार बांधणे हे सुरू झाले होते. त्यामुळे त्यांनी सुद्धा स्थापत्य कलेला नकार दिलेला नाही पण याचा एक विचित्र दुष्परिणाम असा झाला की चित्रकला ही स्थापत्य कलेवरच आरोपीत करण्यात आली आणि त्यातूनच मग लेणी नावाची गोष्ट अधिकाधिक निर्माण झाली . म्हणजे चित्रकला ठेवायची पण स्थापत्य कलेचा भाग म्हणून जिवंत ठेवायची अशी ही तडजोड होती . पुढे मुस्लिम धर्माने नेमकी हीच गोष्ट केलेली आपल्याला दिसते पण लेण्यांचे ऐवजी त्यांनी कॅलिग्राफीक वॉल पेंटिंग तयार करण्यावर भर दिला . याचे कारण उघड आहे वाळवंटामध्ये लेणी निर्माण करणे अवघड आहे . पण याचा एक फायदा असा होतो की लेण्यांच्या मध्ये कधीही द्विमिती असत नाही तिथे त्रिमिती असते त्यामुळे साहजिकच त्रिमितीचा वापर लेण्यांच्या मध्ये प्रचंड झालेला दिसतो . याउलट इस्लाम मध्ये मात्र द्विमितीयता कळत नकळत महत्त्वाचे झाल्याने कुराणा मधलेच मेसेज कॅलिग्राफीकवॉल पद्धतीने पुढे आलेले आहेत .त्यांचे मुख्य स्वरूप भिंतींच्या वर स्थापन केलेल्या चित्रकला व अक्षर कला असेच आहे . या सर्व कलांच्या मध्ये त्यामुळेच पावित्र्य आणि सौंदर्य यांचे जतन केलेले दिसते. 


प्रश्न असा येतो की मग धार्मिक कलेमध्ये कलावंताचे मन येते की नाही ? धार्मिक कला ही वस्तुनिष्ठ असते कलाकृतीनिष्ठ असते ? जर का कला ही मन आणि संसार यांच्या सहचार्यातून सौंदर्य निर्माण करत असेल तर कलावंताच्या मनाचे धार्मिक कलेमध्ये नेमके काय स्थान आहे ? की इथे धार्मिक मन हे साचा बनते आणि हा साचा सर्वच कलांच्या मध्ये सारख्याच पद्धतीने उमटायला लागतो ? त्याच त्याच पद्धतीच्या शिव, शंकर, शक्ती, पार्वती, गणपती , स्कंद, सिद्ध,बुद्ध , तीर्थंकर, महावीर यांच्या तशा तशाच सारख्या सारख्या मुर्त्या निर्माण व्हायला लागतात ? 


पुढे मग साहित्यामध्ये रामायण आणि महाभारत आणि पुराणे यांच्यामधूनच तुम्ही कथा घेतल्या पाहिजेत अशी सक्ती येते याचा परिणाम असा होतो की तीच तीच कथानखे तशी तशीच यायला लागतात कथानक बदलून त्याचे कथानख होते आणि तीच कलेमध्ये उमटायला लागतात . पूर्वी लोककला रेकॉर्ड होत नसल्याने कधीतरी त्या वाट्याला यायच्या आणि त्यामुळे त्या अभिनव आणि ताज्या वाटायच्या परंतु आता मुद्रणक्रांती झाल्यामुळे अवस्था अशी आहे की या लोककला सहजरीत्या उपलब्ध होतात आणि त्यामुळेच त्यांचा तोच तोच अनुभवसाचा इतका कंटाळवाणा होत जातो की आता त्या पद्धतीचा प्रतिसाद त्या रसिकांच्याकडून मिळत नाही . मुद्रण कलेने घडवून आणलेले हे बदल धार्मिक कलेच्या लक्षात येत नाहीत . अशावेळी मग कांतारा सारखी फिल्म निर्माण करावी लागते जी कथानकच नवीन आणते पण धार्मिक कलेचा बाज बदलत नाही . म्हणजेच इथे कलावंताचे मन कलाकृतीमध्ये येऊ दिलेले आहे त्यामुळेच कथानक साचेनिष्ठ होत नाही . कुठल्याही कलाकृतीमध्ये कल्पनाशक्तीला मर्यादा घालून चालत नाहीत कल्पनाशक्ती मोकाट सुटली नसली तरी पिसाट सुटली पाहिजे म्हणजे मग तिला तर्कशास्त्राचे अधिष्ठान राहत ती अत्यंत व्यवस्थितपणे फंक्शनिंग करत राहते . कल्पनाशक्ती ही संवेदनशक्ती , भावशक्ती आणि बुद्धीशक्ती यांच्यापेक्षा वेगळी असते . ती या तिन्ही शक्तींना व्यवस्थित संघटित करत पुन्हा स्वतःच्या कल्पनेच्या जीवावर कल्प रचत जाते आणि हा कल्पच मग कल्पकृती किंवा कलाकृती बनतो . त्या उलट तंत्रअधिष्ठत कला ही साच्याच्या आधारे संकल्प रचत जाते. इथे संकल्प शक्ती कल्पनाशक्तीवर मात करते आणि त्यामुळे त्याच त्याच संकल्पना येतात आणि या संकल्पना शक्तीमुळे कल्पनाशक्तीचा नाश होत जात कल्पक कृती निर्माण होण्याऐवजी संकल्प कृती निर्माण होते . आधीच ठरवून कल्पना केलेली अशी ही कृती असते . आणि आधीच ठरवलेल्या कल्पना या नेहमीच संकल्पना असतात . म्हणजे मग गझल त्याच त्याच प्रेम विषयक संकल्पनांच्या गिरमिटातून फिरत राहते . अभंग त्याच त्याच भक्तीच्या ठराविक संकल्पनांच्या गिरमिटातून फिरत राहतात . वृत्त ही सुद्धा एक संकल्पना असते हेच अनेक गझलकारांच्या लक्षात येत नाही . त्यामुळेच त्या वृत्ताला रिटायर करावे लागते जेणेकरून कल्पनाशक्ती अधिक मोकळी होत जावी अर्थातच मुक्त गजलेने मुक्त केलेली कल्पनाशक्ती पुढे पुन्हा मीटर मध्ये बसवून तिला सादर करणारे लोक येतात पण ही सर्व नंतरची गोष्ट असते . प्रतिभावंतांची प्रतिभा ही नेहमीच कॉपी केली जाते . पण ही जी काही प्रतिभा शक्ती असते ही जी काही मनशक्ती असते ती फार पारदर्शकपणे वापरावी लागते . तिचा व्यवहार आणि व्यापार हा मुक्त ठेवावा लागतो अन्यथा कलेमध्ये संकल्पनाशक्ती कधी उडी मारते आणि प्रतिभा शक्तीला कधी रिप्लेस करते ते कळत पण नाही . विशेषता भावनांच्या ठराविक गिरमिटातून फिरायला आवडणारे लोक नेहमीच प्रतिभाशक्ती बाजूला करत लोकांना आवडणाऱ्या भावना लोकांच्याच पद्धतीने सादर करत राहतात . इथेच मग लोककला सुद्धा लोकशरण कला बनतात आणि धार्मिक कला सुद्धा लोकधर्मशरणकला बनते . अनेक लोक कलावंतांना लोककला आणि लोकशरणकला यांच्यातला फरक कळत नाही . हे लोक त्याच ठराविक गिरमिटातील लोककला सादर करत राहतात आणि लोकांना खुश करत राहतात . 


मानवी जीवनामध्ये अहम मधून आणि क्रियाशक्तीमधून निर्माण होणाऱ्या संकल्प शक्तीचा एक रोल आहे आणि तो अमान्य करण्याचे कारण नाही पण संकल्प शक्ती ही फक्त मी कलाकृतीचा संकल्प करत आहे एवढा संकल्प करण्यापुरतीच मर्यादित असली पाहिजे तीच जर का मुख्य नियंत्रण करायला लागली की मग प्रतिभा शक्ती आणि कल्पनाशक्ती या दोन्ही तिच्या आहारी जातात आणि कला गणितमानी प्रेडिक्टेबल बनत जाते .


कुठलीही कला ही अंतिमतः अवकाश आणि काळ यांच्यामध्ये निर्माण होत असते साहजिकच अवकाश शक्ती आणि कालशक्ती यांच्यापासून ती मुक्त असत नाही . अवकाश शक्ती ही नेहमीच लय निर्माण करत असते तर काल शक्ती नेहमीच ताल निर्माण करत असते . कुठल्याही कलाकृतीला त्यामुळेच लय आणि ताल या दोन्ही गोष्टी असतात . त्या अंगाचे रूपांतर सौष्ठवात करतात . ताल जसा गणितमानी असतो तसाच तो गतिमानी सुद्धा असतो म्हणूनच गझल मुक्त होऊ शकते कुठलाही फॉर्म मुक्त होऊ शकतो . अर्थात गणितमानी फॉर्म हा नेहमीच जास्त चित्त वेधक वाटतो कारण तो संगीताला ठराविक फॉर्ममध्ये पाहत असतो आणि त्याच्या साच्याची आपल्याला सवय झालेली असते पण ज्याला मुक्त संगीत कळते त्याला लयीच्या साह्याने खूप काही निर्माण करता येते. 


संवेदनांना चिन्हशक्तीमध्ये रूपांतरित करून चिन्हअनुभव निर्माण करणे म्हणजे कला होय. चिन्हशक्तीचा पाया हा प्रामुख्याने प्रज्ञा किंवा बुद्धी असते . किंवा मग शरीर असते . कलेमध्ये कलावंत मन ओतताना कधी कधी भावशक्ती सुद्धा ओततो आणि ही भावशक्ती अनेकदा कलेला अधिक प्रभावी बनवते . प्रश्न असा असतो की चिन्हशक्ती मध्ये भावशक्ती कशी ओतायची ? कलेमध्ये शरीर हे नेहमीच चिन्ह म्हणून येते त्यामुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा असतो कारण प्रत्यक्षामध्ये चिन्ह म्हणजे शरीर नसते तर शरीराचे शारीरिक सादरीकरण असते . या सादरीकरणातील संकेतच जर का विसरले गेले तर किंवा हे संकेतच कळणारे नसतील तर अनेकदा अर्थच प्रतीत होत नाही . चिन्हाचा कुठलाही मूलभूत अर्थ हा संकेत अर्थच असतो संकेतार्थ असतो . विशेषतः भाषाकलेमध्ये हे खूप तीव्रतेने जाणवते . भारतातल्या अनेक कला ह्या वैष्णव धर्माच्या उदयानंतर सांकेतिक बनत गेल्या आणि नंतर नंतर साचेबद्ध बनत गेल्या . त्यामुळेच इसवी सन १००० नंतर दृश्यात्मक कला जवळजवळ नाहीशा झाल्या किंवा मग साचेबद्ध झाल्या आणि फक्त साहित्यिक कला संतांच्या मुळे भरभराटीला आल्या . वैदिक धर्मातल्यास वेद ग्रंथांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यामध्ये भाव शक्ती खूप आहे साहजिकच या भावशक्तीचे रूपांतर भक्तीशक्ती मध्ये करत करत वैष्णववादाने भाव वाद आणि भक्तीवाद इतका प्रबळ केला की इतर सर्व गोष्टी हळूहळू नाहीशा होत गेल्या . या काळातला मुख्य संकेत भक्ती काव्य झाले . साहजिकच मानवी जगण्याचा सर्व व्यापार आणि व्यवहार हा सुद्धा भक्तीकेंद्री झाला आणि इथेच तर्कशास्त्र फाफलत गेले . सर्व कल्पनाशक्ती ही धर्म संकेत निर्माण करण्यात व वाढवण्यात वाया गेली . त्यातूनच व्रत वैकल्याचा महिमा वाढला धार्मिक मन याचा अर्थ भाविक मन असा झाला . साहजिकच जे व्यक्त करतात ते पण भाविक आणि जे अनुभवतात तेही भाविक ! आज सुद्धा भक्तीचा चढलेला जोश आणि ज्वर ओसरलेला नाही . उलट भक्ती सुद्धा अधिकाधिक भक्ती कांडात्मक भावकांडात्मक होत गेली . हे एका अर्थाने वैदिक साहित्यिकाचे पुनराआगमन होते ज्याला मोक्षाशी काही देणे घेणे नव्हते पण जो प्रचंड मांत्रिक होता आणि मंत्रांना भुलणारा होता . याचा परिणाम असा झाला की ज्ञानेश्वर ते तुकाराम यांनी निर्माण केलेले भक्ती काव्य हे आता मंत्र काव्य बनून गेलेले आहे . आणखी काही वर्षांनी हा अभंग म्हटलं की असा उतारा पडतो आणि तो अभंग म्हटला तर भूतबाधा दूर जाते अशा प्रकारचे संकेत निर्माण झाले तर आश्चर्य वाटू नये कारण पुढची स्टेप भावकाव्याची नेहमी हीच असते . 

श्रीधर तिळवे नाईक

सत्य व्यवहारवाद आणि उत्तर व्यवहारवाद १२ माया कला आणि उत्तर व्यवहार वाद श्रीधर तिळवे नाईक 

लॉजिकल पॉझिटिव्हिजनचा काळ साधारणपणे 1950 च्या आसपास संपायला लागला आणि त्याच वेळेला इंग्लंडमध्ये सौंदर्य व्यवहारांमध्ये काही नवीन गोष्टी चमकताना दिसायला लागल्या याचे कारण उघड होते

साम्राज्यवाद संपला तेव्हा दोन्ही बाजूंनी म्हणजे इंग्लंड आणि भारत अशा दोन्ही ध्रुवांवर राज्य करणारे एक मेगा narrative कोसळले आणि इंग्लंड साम्राज्यापासून स्वतंत्र झाला तर भारत साम्राज्यवादापासून स्वतंत्र झाला . साहजिकच लंडन हे आता जागतिक केंद्र उरले नाही आणि प्रथमच लंडन चा विचार इंग्लंडचे लंडन या पद्धतीने होऊ लागला . लंडनला समांतर अशी अनेक सत्ता केंद्र उदयाला आली आणि ती ब्रिटिश साहित्यात सुद्धा कार्यरत झाली आयर्लंड स्वतंत्र झाले होते स्कॉटलंड स्वतंत्र झाले होते आणि त्यांच्या जाणीवा या ब्रिटिश आहेत की नाही यावरच वाद होऊ लागला . याद भरीस वर म्हणून ज्यांच्यावर राज्य केले होते त्या लोकांचे झालेले स्थलांतर आता वेगळ्या प्रकारचे इंग्लिश निर्माण करायला उतावीळ झाले होते ज्यातून पुढे सलमान रश्दी सारखा लेखक निर्माण होणार होता 

या काळातला उत्तर व्यवहारवाद हा व्यवहारातील भाषांना अतिशय महत्त्व देत होता साहजिकच बोलीभाषा आणि स्थानिक बोली यांना अतिशय महत्त्व प्राप्त झाले . अचानक कवितेमध्ये कवींची सांस्कृतिक पार्श्वभूमी वाद्यवादन करू लागली. चांगली कविता आणि वाईट कविता असे दोन कवितेचे प्रकार जास्त महत्त्वाचे झाले . शक्यतो वाईट कवितेची सर्व लक्षणे टाळणे सुरू झाले. 

सर्वात मुख्य प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे सौंदर्य हे विज्ञाननिष्ठ पद्धतीने विश्लेषणाच्या कक्षेत आणता येईल का ? जोपर्यंत धार्मिक कला राज्य करत होत्या तोपर्यंत धार्मिक सौंदर्यशास्त्र राज्य करत होते परंतु पुरोगामी कालखंडामध्ये विज्ञान हे केंद्रस्थानी आले आणि साहजिकच कलेची वैज्ञानिक मीमांसा सुरू झाली आणि त्यातूनच पुढे सौंदर्यशास्त्र किंवा सौंदर्य विज्ञान नावाचे एक विज्ञाननिष्ठ विश्लेषण पुढे यायला लागले . ज्याप्रमाणे विज्ञानामध्ये सर्व गाईंच्या मध्ये "गोत्व" हा सत्वात्मक घटक असतो आणि त्याचे वैज्ञानिक विश्लेषण शक्य असते त्याचप्रमाणे सर्व कलाकृतींच्यामध्ये "सौंदर्य"हा सत्वात्मक घटक असतो अशी ही धारणा होती अर्थातच 1950 नंतर याला आव्हान देणारे लोक निर्माण झाले. आधुनिक सिद्धांतांचे जे वैशिष्ट्य आहे त्यामधील एक वैशिष्ट्य म्हणजे द्विध्रुवात्मकता ! साहजिकच रा भा पाटणकर यांनी आपल्या सौंदर्य विश्लेषणात लौकिकतावादी आणि अलौकिकतावादी असे दोन ध्रुव कल्पून सौंदर्यशास्त्राचा इतिहास मांडला या काळामध्ये टी एस एलियट याने परंपरेची पुन्हा स्थापना केली आणि सर्व साहित्य हे परंपरेशी जोडले गेले पाहिजे आणि लेखक परंपरेत उभा राहून लिहितो असा सिद्धांत मांडला ज्याचा प्रचंड प्रभाव आपल्याकडच्या सर्व आधुनिक साहित्यिकांच्या वर पडलेला दिसतो आणि त्यातूनच पुढे देशी वादाचा उदय झाला या देशी वादामुळेच देशी सौंदर्यशास्त्राचा नेमका काय प्रकार आहे ही चर्चा सुरू झाली.

इंग्लंडचे राज्य होते तोपर्यंत इंग्लंडच्या सौंदर्यशास्त्राविरोधातसुद्धा जाण्याची तयारी अनेकांची नव्हती अपवाद फक्त गांधीच असावेत आता मात्र इंग्लिश भाषेची दादागिरी सहन करण्याची गरज राहिली नाही साहजिकच देशी सौंदर्य शास्त्री जे होते त्यांच्या विश्लेषणाचे नीट अध्ययन सुरू झाले त्यातूनच मग धार्मिक कलांचा अभ्यास सुरू झाला. मात्र हा अभ्यास पुरेसा होता का ? देशीवादाने विठ्ठल आणि खंडोबा हे दोघेही देशी देव आहेत अशी संकल्पना मांडली पण प्रत्यक्षामध्ये प्रस्थापित केली नाही उलट वैष्णववादाला अधिकाधिक उत्तेजन देणारे लिखाण केले म्हणजेच उत्तर भारतीय लोकांचा मार्गी वाद या लोकांनी स्वीकारला ज्याच्यामुळे आता मुंबई ही उत्तर भारतीय होत चालली आहे. सौंदर्यशास्त्रामध्ये तर संपूर्णपणे संस्कृत साहित्य शास्त्राची दादागिरी सुरू झाली . देशीवादाने या दादागिरीला विरोध केला आणि आपले सौंदर्यशास्त्र संतांच्या साहित्यापासून सुरू केले परंतु ज्या तऱ्हेने मर्ढेकर आणि प्रभाकर पाध्ये यांनी नवीन सिद्धांत तयार केले सिद्ध केले तसे काही या लोकांना जमले असे वाटत नाही . वास्तविक खरा प्रश्न असा होता की ज्याप्रमाणे गणितामध्ये सेट थेरी अप्लाय होते आणि दोन गोष्टींचे सेट वेगळे असू शकतात म्हणजे नैसर्गिक नंबरचा सेट एक असला तरी नंतर समसंख्यांचा एक सेट आणि विषम संख्यांचा एक सेट असे दोन सेट होऊ शकतात त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये सुद्धा विज्ञानाचा एक सेट तयार होतो आणि अनुभवाचा एक सेट तयार होतो असे आपण म्हणू शकतो आणि आपण असेही पुढे जाऊन म्हणू शकतो की अनुभवाचा जो सेट असतो तो पूर्णपणे वेगळा असतो आणि त्याचाच आधार घेऊन कला क्रीडा आणि धर्म निर्माण होतात . मोक्ष हा सगळा सेट मोडून काढतो आणि सेटातित करतो . कला, क्रीडा आणि धर्म या तिन्ही गोष्टींच्या केंद्रस्थानी अनुभव असतो आणि अनुभवांमध्ये ज्ञान आवश्यक असले तरी ते केंद्रस्थानी असत नाही . इथे इंद्रिय आणि मन यांची प्रोसेस जे अनुभव्य असते त्याला जाऊन भेटते भिडते . सचिन तेंडुलकर जेव्हा खेळत असतो तेव्हा आपण फक्त अनुभव घेत असतो सचिनची उंची किती आहे आणि वैज्ञानिक दृष्ट्या त्याचे जेनेटिककोड काय आहे ते पाहत नसतो तर आपण फक्त त्याची बॅटिंग पाहत असतो त्या बॅटिंगचा अनुभव घेत असतो सर्वसाधारणपणे हेच कलाकृतींच्या बाबतीतही घडते तिथे सुद्धा आपण केवळ अनुभवच घेत असतो म्हणजेच अनुभव हा जर का आपण एक वेगळा अनुभव संच मानला तर त्या अनुभव संचामध्ये आपण कला क्रीडा आणि धर्म यांचा समावेश करू शकतो . यातील धर्म आवश्यक नाही त्यामुळे तिथे आपण वेगळे उत्सव आणले पाहिजेत आणि असे उत्सव आपण अलीकडच्या काळामध्ये आणायला सुरुवात केलेली आहे मात्र धार्मिक उत्सव पूर्णपणे समाजामधून गायब करणे आवश्यक आहे ते होत नाहीये आणि म्हणूनच धर्माचा प्रभाव कमी होत नाही . भारतीय जनता पक्ष जेव्हा कुंभमेळ्यासारखी घटना घडवतो तेव्हा त्याला अनुभव द्यायचा असतो आणि त्यासाठी तो कुंभमेळा इव्हेंट म्हणूनच निर्माण करतो एका अर्थाने अनुभव अनुभव निर्माण म्हणून सादर करणे म्हणजेच इव्हेंट होय आणि हा अनुभव इ- इव्हेंट असेल तर त्याची व्याप्ती वाढत जाते एका अर्थाने हे चिन्हघटन असते आधुनिक आणि उत्तराधुनिक कालखंडामध्ये सर्वसाधारणपणे घटना हे घटन होते परंतु चौथ्या नवतेमध्ये अचानक हे घटन फक्त घटन न राहता चिन्हजालघटन झाल्याने त्याला एक विशिष्ट प्रकारची दिशा प्राप्त व्हायला लागली म्हणजेच सादरीकरण करतानाच हे सादरीकरण टीव्ही आणि मोबाईलवर सादर होणार आहे हे गृहीत धरूनच घटनाचे सादरीकरण होऊ लागले त्यामुळे त्याचे मांडणशिल्प बदलले ठाय बदलला मांडण स्थापत्य बदलले आणि त्याची प्रोसेस त्याचा व्यवहार त्याचा व्यापार बदलला . लौकिक आणि अलौकिक असे दोन्ही आधुनिक ध्रुव कोसळून पडले आणि उरले ते फक्त सादरीकरण ! सादरीकरणात बहूध्रुव असतात म्हणजेच सादरक , जालक , प्रक्षेपक आणि सादरसिक! अनेकदा तर हे एकमेकाला भिडतात विशेषता प्रत्यक्ष इव्हेंट मध्ये असे घडू शकते म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की इथे अचानक सेकंड आणि थर्ड ऑडियन्स तयार होतो म्हणजेच मैदानामध्ये उपस्थित असलेला प्रत्यक्ष पहिला ऑडियन्स आणि या सर्वांचे प्रक्षेपण सादर करण्यासाठी शूट करणारा शूट करता करता पाहणारा दुसरा ऑडियन्स आणि या सगळ्याचे प्रक्षेपण एडिट करणारा तिसरा ऑडियन्स आणि शेवटी पाहणारा चौथा प्रक्षेपणिक ऑडियन्स ! 

याचा मग साहजिकच सादर करणाऱ्या माणसावर सुद्धा परिणाम होतो. उदाहरणार्थ क्रिकेटमध्ये आपण पाहतो की आता काही कॅच केवळ टेलिव्हिजनवर कसे दिसतील म्हणून कॅच घेतानाच मॅनेज केले जातात. उगाचच एक्स्ट्राची स्टाईल मारली जाते .हीच गोष्ट शॉट मारताना घडते . अनेकदा हल्ली बॉलर लोक आपली काही सिग्नेचर परफॉर्मन्स ची स्टेप तयार करतात . विशेषता विकेट पडली की घेतली की ! फोर लेयर ऑडियन्सचा पडलेला हा प्रभाव आहे . 

कविता सादर करताना कधी कधी असे घडते का तर हो असे घडते . अनेकदा रसिकांचा मूड बघून कविता बदलल्या जातात . मला आठवते की एकदा चौघांच्या कविता कार्यक्रमात आम्हाला अचानक कळले की इथे फार गंभीर काही चालणार नाही साहजिकच तिघांनी आपल्या लाईट लाईट कविता काढल्या आणि मी सुद्धा ऑब्जेक्शन घेणारा त्या दिवशी ऑब्जेक्शन घेतले नाही कारण ऑडियन्स खरोखरच तसा खतरनाक होता. आता हे मी censor करणारा होतो कारण कार्यक्रमाची गुणवत्ता काही झाली तरी लोककेंद्री होऊ द्यायची नाही असा माझा आग्रह होता तरीसुद्धा चमत्कारिक ओडियन्स बघून बदल घडवावा लागला होता आता हे जर गंभीर कार्यक्रमाबाबत झाले असेल तर जर का खरोखरच लोकांच्या मनोरंजनासाठी होणारे काव्यवाचन असेल तर तिथे किती मोठ्या प्रमाणात बदल घडू शकतात याची कल्पना येते . याउलट विलास कुमार कांळे यां आमच्या मित्राने प्रिन्सिपल झाल्यानंतर एक काव्यवाचन त्याच्या कॉलेजमध्ये ठेवले होते आणि मी एकटाच कविता वाचणारा होतो. चौथ्या नवतेच्या कविता असून सुद्धा खेड्यातून आलेल्या या सर्व कॉलेजच्या पोराकडून त्या काळात इतकी मोकळी दाद दिली होती की टाळ्यांच्या वर टाळ्या पडत होत्या प्रश्न असा होता की त्यांना ह्या कविता सहजरित्या कशा काय कळाल्या? याचे कारण त्यांच्यावर कसले संस्कार झालेले नव्हते पूर्वी मुक्त गजला मी बिनधास्त वाचायचो आणि त्या अॅप्रिसिएट व्हायच्या गझल म्हणून त्यांना स्वीकारताना कधीही या लोकांना प्रॉब्लेम नसायचा याचे कारण उघड होते त्यांच्यावर अनेकदा वाईट कवितांचे किंवा पारंपारिक संस्कार झाले न्हवते ते नंतर झाले की रसिक बिघडायला लागतात अन्यथा ते खूप ओपन असतात हा माझा अनुभव आहे .

काव्यवाचन हा एक थेट व्यवहार आणि व्यापार असतो साहजिकच मी तो मुद्दाम म्हणून अधून मधून करत असतो कारण लोकांच्यात नेमके काय चाललेले आहे ते कळते 

अर्थातच काव्य वाचण्याचा इव्हेंट व्हावा की न व्हावा हा नेहमीच वादाचा मुद्दा असतो . आपण मुळातच ज्या पद्धतीच्या युगात वावरतो आहे तिथे मला स्वतःला काव्यवाचन हे खूप आवश्यक वाटत आलेले आहे आणि मी कायमच त्याला जोरदार पाठिंबा दिलेला आहे . 

प्रश्न असा आहे की काव्यवाचनाचे म्हणून काही नवीन सौंदर्यशास्त्र निर्माण होऊ शकते का ? उदाहरणार्थ अशोक नायगावकर यांच्याकडे एक विशिष्ट पद्धतीची शैली आहे तर आपण त्या शैलीचा काही सौंदर्यात्मक पातळीवर विचार करणार आहोत का ? किंवा अनुभवाच्या पातळीवर ? 

आज आपण असे नक्की म्हणू शकतो की सौंदर्य हा अनुभवाचा केवळ भाग आहे पण अनुभव हा याहून अधिक काही शक्तींनी युक्त असतो . सौंदर्य शक्ती ही केवळ एक शारीरिक शक्ती आहे आणि ती कवितेमध्ये किंवा कलेमध्ये शारीरिक फॉर्म ची शक्ती म्हणून येते . हा शारीरिक फॉर्म बद्ध असावा की मुक्त असावा हे ज्याने त्याने ठरवावे पण आमचंच म्हणणं खरे हे टोक असते .

कांट, हेगेल , ब्राँसांके ,क्रोचे आणि कलिंगवूड या पाचही विचारवंतांनी ज्ञानाच्या व्यवस्थेपेक्षा सौंदर्याची व्यवस्था वेगळी असते असे सांगितले खरे परंतु ते हे सांगायला विसरले की ही व्यवस्था प्रत्यक्षात सौंदर्याची नसून अनुभवाची व्यवस्था असते . प्रत्येक अनुभव हा सौंदर्याने भरलेलाच असेल असे नाही. एखादा अनुभव अत्यंत फ्रस्टेशननेसुद्धा भरलेला असू शकतो आणि तो तरीही कलात्मक अनुभव असू शकतो म्हणजे वेटिंग फॉर गोदो या नाटकामध्ये आपणाला सौंदर्य अनुभव मिळतोच असे म्हणता येत नाही . माझ्या मते आपण सौंदर्य अनुभव असा शब्द वापरण्यापेक्षा व्यवहारमुक्तअनुभव असा शब्द कलेतल्या अनुभवासाठी वापरावा म्हणजे व्यवहारा पासून मुक्त असलेला अनुभव ज्याला आपण व्यवहार मुक्त अनुभव म्हणू शकतो . माणसांच्या आयुष्यात असे व्यवहार मुक्त अनुभव असतात अगदी मैत्रीमध्ये सुद्धा असे अनुभव येतात दुर्देवाने मैत्रीमधले असे व्यवहार मुक्त क्षण आता कमी होत चालले आहेत आणि खरी चिंतेची गोष्ट तीच आहे . एकीकडे आपण सातत्याने टीव्ही पुढे बसतो स्क्रीन पुढे बसतो याचे सर्वात मोठे कारण तिथे मिळणारे व्यवहार मुक्त अनुभव होय प्रत्यक्षामध्ये सध्या कलेची बजबज इतकी वाढलेली आहे की हे व्यवहार मुक्त तथाकथित क्षण चक्क तुमच्यासाठी व्यवहार पाहूनच निर्माण केले जातात . जाहिराती तर उघड उघडपणे तुमच्या या अनुभव विश्वाचे शोषण करतात . अलीकडच्या काळात जवळजवळ ७० टक्के अनुभव आपण केवळ अनुभवासाठी अनुभव म्हणून घेत असतो म्हणजेच एका अर्थाने ७०%टक्के जीवन हे सध्या व्यवहार मुक्त अनुभवाने व्यापून टाकलेले आहे. माणसे त्यामुळेच जालव्यसनाधीन होत आहेत हे जाल व्यसन इतके वाढत चालले आहे त्याचे कारण ते व्यवहार मुक्त आहे असे आपणाला वाटते फेक मुक्तीचा फेक अनुभव येतो . एका अर्थाने स्क्रीन ड्रग सारखा काम करतो . प्रत्यक्षामध्ये हे व्यवहार मुक्त अनुभवाचे जालजग आपल्याला निष्क्रिय बनवत आहे किंवा अपस्तुतरीत्या एक्सायटिंग बनवत आहे उदाहरणार्थ निवडणुका या एक्सायटिंग इव्हेंट बनलेल्या आहेत त्यांचे निकाल हे आपण इव्हेंट बनवलेले आहेत अनेकदा हे आपण लक्षात घेत नाही . व्यवहार मुक्त जीवन हे मोक्षयुक्त जीवन असेलच असे नाही. कारण व्यवहार मुक्त जीवनामध्ये अनुभव व्यवहारापासून मुक्त वाटत असला तरी प्रत्यक्षात तो तसा असत नाही तो अनेकदा तुम्हाला बेशुद्ध करण्यासाठी वारंवार सादर केला जाऊ शकतो. म्हणजेच तो पॉलिटिकल असू शकतो . याचा अर्थ जाल व्यवहार ही एक अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट आता बनत चालले कारण ज्या व्यवहारातले अनुभव हे एकेकाळी अत्यंत इनोसंट मानले जात होते तसे ते आता राहिलेले नाहीत कला कमालीची पॉलिटिकल बनवण्यात आलेली आहे कारण ती धंदेवाईक बनलेली आहे किंवा धंदेवाईक लोकांनी तिचे प्रक्षेपण ताब्यात घेतलेले आहे. हे धंदेवाईक प्रक्षेपण जालअनुभव अत्यंत इनोसंटली कला अनुभव असल्यासारखे व्यवहार मुक्त अनुभव असल्यासारखे सादर करते अगदी बातम्या सुद्धा कला सादर व्हावी , कला अनुभव सादर व्हावा तशा पद्धतीने सादर होतात . आता एकदा का तुमचा सगळा वर्तमान हा जाल वर्तमान बनला आणि तो जर का कला अनुभव म्हणूनच सादर होणार असेल तर मग कला कुठे सुरू होते आणि कला कुठे संपते हे कळणे मुश्किल होऊन बसते. जे प्रत्यक्षात व्यवहारी आहे ते प्रत्यक्षात कला अनुभव म्हणून सादर होते आणि साहजिकच मग आपण व्यवहारी घटनांच्या कडे सुद्धा करमणूक म्हणून पाहायला लागतो. ज्या घटनांचा ज्या निर्णयांचा परिणाम आपल्या आयुष्यावर आपल्या व्यवहारावर आपल्या व्यापारावर होणार असतो त्या घटना कलानुभव म्हणून सादर होणार असतील आणि आपण जर का त्या कला अनुभव म्हणून घेणार असू तर मग वैचारिकतेची वाट लागणे अटळ असते आपल्या नैतिक जाणीव बधिर होणे अटळ असते . आपल्याला एका अर्थाने व्यवहार कळू न देणे हाच अजेंडा बनत जातो म्हणजे व्यवहार हा कला व्यवहार बनवून आपल्याला अज्ञानी बनवले जाते. बधिर बनवले जाते . सगळीकडे कॅमेरे लावून आपल्यावर वॉच ठेवला जातो आणि याला बुरखा म्हणून सुरक्षिततेचे कारण सातत्याने दिले जाते आणि तुम्ही कसे आरक्षण असुरक्षित आहात हे जास्तीत जास्त बिंबवले जाते जेणेकरून तुम्ही ही सर्व कॅमेरागिरी स्वीकारावी अनेक जातीला जाणीवपूर्वक कारागिरी केले जाते . याचा दुष्परिणाम होतो तो म्हणजे तुम्हाला या सगळ्या कारागिरीचे कला अनुभवांचे व्यसन लागते. जी कला एकेकाळी तुम्ही शुद्धीवर यावे तुम्हाला वाहन मिळावे म्हणून निर्माण होत होती ती आता तुम्ही अधिकाधिक बेशुद्ध व्हावे म्हणून काम करायला लागते कलावंतांच्या कडून कला अनुभव हिसकावला जातो आणि तो जास्तीत जास्त स्क्रीन मालकांच्याकडे सरकत जातो. हिशेबी कलानुभव सादर केले जातात. आणि तुम्ही त्यांना addict व्हावे म्हणून प्रयत्न केले जातात स्क्रीन तुमचा असतो पण त्यावर जे काही येते ते तुमचे नसते . तुमच्या डोळ्यांना बळकवण्याच्या आणि डोळ्यांच्या द्वारे मेंदू बळकवण्याच्या या तऱ्हा मोहम्मय असतात मोहनिमद असतात म्हणजेच मोह आणि मध यांनी युक्त व मद वाढवणाऱ्या असतात. या सगळ्या प्रसारामध्ये आपोआपच मग सौंदर्याचा आणि पावित्र्याचा जयजयकार केला जातो कारण जोपर्यंत तुम्ही अशा प्रक्षेपणाला धार्मिक टच देत नाही तोपर्यंत ते प्रक्षेपण ऑथेंटिक होत नाही . साहजिकच या प्रक्षेपणांच्यावर धार्मिक नैतिकतेचा दबाव वाढत जातो. लोक आता फक्त लोक राहत नाहीत ते क्राउड बनतात नंतर मास बनतात . आणि तुम्ही सुद्धा Net Mass बनून भाग बनता आणि त्याला साथ द्यायला लागता. या नेट मासच्या काउंटिंगचे एक भागधारक म्हणून तुम्हाला वापरले जाते .

म्हणूनच जालव्यसनापासून मुक्ती ही आता मोक्षासाठी बेसिक गरज बनून गेली आहे . तुम्ही जोपर्यंत जालव्यसनी आहात तोपर्यंत तुम्हाला मोक्ष मिळण्याची कसलीही शक्यता नाही .

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे