उत्तरे

 आशुतोष दिवाण ह्यांनी माझ्या छोट्या लेखावर पुढील कॉमेंट दिलीये


Ashutosh Diwan

सर,

आपल्याइतका अभ्यास व टेक्निकल जार्गन कळत नाही,पण लिखाणाचा जीस्ट समजून घ्यावा.

आपण अस्तीत्ववादी/ॲबसर्ड अस्तीत्ववादी या कॅटॅगिरीत जी नावे घालता त्यातील

सारंग,रेगे वगैरे ठीक आहे पण नगरकर यांच्याबद्दल काही समजत नाही.रेगे सारंगांचे साहित्य आपल्या जीवनाला सूक्ष्मपणे लागू आहे असे ॲार्गॅनिकली वाटत राहते,तसे नगरकरांचे,विशेषत: इंग्रजी लेखन वाटत नाही.इंटेलेक्च्यूअली ते तंत्र त्यांनी वापरले आहे व आपल्या कसल्याच स्पष्ट अस्पष्ट जिवनानुभवाला किंवा जीवनआकलनाला ते जुळत नाही असे वाटते.

तसाच अनुभव मराठीत या दिशेचे कवि,”अरुण कोलटकरची कविता”नंतरचे कोलटकर आणि चंप्र आणि लाखे यांच्याबद्दल जास्त येतो.बळवंतबुवाच्या कविता काय,द्रोण काय हे तत्कालीन वाटत राहते.चंप्रंचे एकवेळ ठीक आहे पण आजचे मान्यताप्राप्त महत्वाचे कवी लाखे यांची ॲबसर्डीटी इतकी इनकोहेरंट असते की ती परपझलेस वाटते.अगदी वेटींग फाॅर गोदो सुद्धा माझ्या आयुष्याला लागू आहे हे मला कळते तसे या कविंचे होत नाही.वाचकाला कसलेच भान न देणारी चमत्क”कृती”चांगली महत्वाची कशी म्हणायची?मी नगरकरांच्या कादंबय्रा वाचण्यात वेळ वाया का घालवायचा हे मला कळत नाही.मार्गदर्शन व्हावे.

(श्रीधर तीळवे यांना विचारलेला एक प्रश्नवजा कमेंट)


उत्तर

आशुतोषजी धन्यवाद ! अस्तित्ववाद ही आशयकेंद्री चळवळ होती आणि तिने अनेक संरचना धारण केल्या त्यातील जवळ जवळ शेवटची संरचना अब्सर्ड चळवळ जी सात्रच्या ! किरण नगरकर आणि भाऊ पाध्ये ह्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ह्यांनी अस्तित्ववादी आणि वास्तववादी असे दोन्ही पद्धतीचे लेखन केले हे काम्यू बाबतही घडलेले आहे त्याची आउटसायडर अस्तित्ववादी तर प्लेग वास्तववादी आहे भाऊ पाध्येंची बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर व नगरकरांची सात सक्क त्रेचाळीस हे अस्तित्ववादी लेखन आहे शक्यता अशी आहे कि सात सक्क आणि बेडरूम स्टोरी अस्तित्ववादी असल्याने तुम्हाला आवडली असेल आणि वास्तववादी लेखन असलेल्या इतर कलाकृती तुम्हाला आवडल्या नसतील तर मी समजू शकतो 


माझा पहिला प्रश्न हा आशय लेखकाने का निवडला असेल असा असतो ककल्ड नगरकरांनी का लिहिली असेल अस्तित्ववाद म्हणेल कि हा अदर चा प्रश्न आहे म्हणजे श्रीकृष्ण गिरीधर गोपाळ हा अदर आहे आणि हा अदर काल्पनिक किंवा फिक्शनल किंवा सररिअल आहे मात्र मीरेसाठी तो वास्तव आहे आता जी गोष्ट आपल्यासाठी काल्पनिक आहे ती दुसऱ्यासाठी वास्तव असेल तर ! सार्त्र असता तर श्रीकृष्ण ही बॅड फेथ आहे म्हणून पाठ करून निघून गेला असता तर किर्केगार्द हा ईश्वर म्हणून थांबला असता नगरकर किर्केगार्दच्या मार्गाने जातात ईश्वर इललॉजिकल आहे म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवतो असं म्हणणारा किर्केगार्द हा मीरेच्या जवळ आहे मीरेच्या श्रीकृष्णात आपल्या वारकरी संतांच्या विठ्ठलात आणि किर्केगार्दच्या गॉडमध्ये फरक नाही प्रश्न असा आहे कि राणाने काय करायचे ककल्ड ही राणाची शोकांतिका आहे नगरकरांना ह्या विषयावर ग्रेट कादंबरी निर्माण करता आली असती पण ते झाले नाही एका अप टू द मार्कपाशी ते थांबले रावण अँड एडीही अशीच जी झळाळी सात सक्क मध्ये आहे ती इंग्लिश लिखाणात नाही  


आपल्या आयुष्याशी जीवनानुभवनाशी जीवनाकलनाशी जुळणारे लेखन अनेक वाचक शोधत असतात तुम्ही जर तसे वाचन करत असाल तर तुमच्यासाठी ती योग्य पद्धत आहे ह्याला मी डिस्कव्हरर वाचक म्हणतो हे लोक आपल्या आयुष्याचा शोध इतरांच्या लिखाणात घेतात तुम्हाला काय आवडलं नाही हे सांगण्यापेक्षा काय आवडलं हे सांगितलंत तर ह्यावर संवाद होऊ शकतो म्हणजे मला फक्त मोक्षावरचं लिखाण भावायचं त्यामुळं विसाव्या शतकातील सगळं लेखन माझ्यासाठी रद्दी होतं ही झाली वैयक्तिक आवड ती ऑब्जेक्टिव्ह आवड म्हणून घेऊन मी समीक्षेत यावे का ? तर नाही आपल्याशिवायही जग असतं आणि त्या जगाच्या आवडीनिवडी आपल्यापेक्षा वेगळ्या असू शकतात माझी दुसरी कसोटी ही चौथी नवता असते पण असे साहित्य जगभर कमी लिहिले जात आहे तर मग काय करावे तर तिसरी कसोटी लावावी म्हणजे किमान कलेने दुसऱ्या आणि तिसऱ्या आधुनिक व उत्तराधुनिक नवतेत असावं आता हे कलाकृतीत नसेल तर काय तर चौथी कसोटी प्रबोधनात्मक कला असते ज्यात त्या कलाकाराचा पिंड आहे का आणि लिहितांना ती व्यक्ती जेन्युईन आहे का हे मी बघतो पाचवी अर्थात प्रतिभेची व कौशल्याची आहे तुमच्या कसोट्या काय आहेत ?


नुसती भावणे हीच एकमेव कसोटी असेल तर आपले फारसे जमणे शक्य नाही कारण भावणे ही आद्य अट आहे पण दुर्देवाने ती सापेक्ष आहे म्हणजे वाचणाऱ्याच्या कुवतीवरही भावणे अवलंबून आहे नवतावादी साहित्य प्रथम भावत नाही कारण वाचकाचा त्या अनुभवविश्वाशी रिलेव्हन्स तयारच नसतो तो हळूहळू तयार होत जातो रणांगण ह्या कादंबरीबाबत हे घडलेले आहे तर वाचक म्हणून आपण अद्ययावत कलेसाठी स्वतःला पुरेसं खुले केले आहे का तेही स्वतःलाच विचारावं लागतं निदान माझा स्वतःचा तसा प्रयत्न असतो 


वाचक म्हणून काहीच तयारी करावी लागत नाही असा एक फार मोठा गैरसमज मराठी लोकांच्यात आहे म्हणून हे तपशीलवार चिंतन !


कोलटकरांच्या चिरीमिरीवर मी शब्दवेध मध्ये लेख लिहिला आहे मला हा संग्रह आवडला होता द्रोणनं मात्र दारुण अपेक्षाभंग केला कारण कोलटकर जे साधायला चालले होते त्याच्याशी विसंगत असे त्यात काहीतरी आहे लाखे हे आरंभापासूनच अस्तित्ववादी लेखक आहेत तुम्ही जर का युरोअमेरिकन साहित्य वाचले असेल तर त्यांच्यात नवीन काहीच सापडत नाही पण ते वगळले तर काही सापडू शकते ऍब्सर्डिटी पर्पझलेसच असते म्हणून तर ती अब्सर्ड असते त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही मराठी आधुनिकतेचा प्रश्न लाखे आणि चं प्र देशपांडे ह्यांच्या संदर्भात मराठी अस्तित्ववादाचा प्रश्न बनून येतो ह्या दोघांनाही मराठी अस्तित्ववाद सापडला आहे का ?


चं प्र देशपांडेची कवितालेखन पद्धत हीच मुळात वेगळी आहे मला स्वतःला भावनाशीलतेपेक्षा त्यांचा भर बुद्धीशीलतेवर आहे असं वाटतं आणि त्यामुळेच भावनाशीलतेला महत्व देणाऱ्या वाचकांना ती अपील होणे शक्य नाही बुद्धीशीलतेवर भर देणाऱ्या काही कविता मीही लिहिलेत त्यामुळं चं प्र नां मी समजू शकतो त्यांच्या कवितेत जेव्हा क्राफ्टिंग अवाजवी महत्वाचे होते तेव्हा त्यांच्या कविता कोसळतात जेव्हा बुद्धीशीलता आणि प्रगल्भता ह्यांचा समतोल निर्माण होतो तेव्हा त्या जमून जातात 


वेटिंग फॉर गोदो ही अद्वितीय कलाकृती आहे तिनं तुम्हाला भान दिलं म्हणजे नेमकं काय केलं ? आणि समजा भान ही तुमची कसोटी असेल तर ती निरपेक्ष आहे का ? तर नाही भान हीही सापेक्ष कसोटी आहे आणि जर ह्या कसोटीनुसार एखादी कलाकृती तुम्हाला भान देत नसेल तर तुम्ही ती वाचूच नये राम गणेश गडकऱ्यांच्या नाटकावर पिंड पोसला गेलेल्या पिढीला वेटिंग फॉर गोदो कसलं भान देणार ? शेवटी लेखक व वाचक ह्या दोन स्वतंत्र व्यक्ती असतात कधी लेखक पुढे असतो तर कधी वाचक आता जो मागे असतो त्याला अंतर भरून काढणे भाग आहे सर्वात उत्तम वाचन तेव्हा होते जेव्हा दोघे हातात हात घालून एकमेकांच्या संहिता एकमेकात घालत चालतात हे सोबत चालणे घडले तर उत्तम नाही घडले तर चालणे सोडून द्यावे हे उत्तम !


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे