गोवा, दमण आणि दीव हे प्रदेश साडेचारशे वर्षे पोर्तुगीज वसाहत होते. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय लष्कराकरवी `ऑपरेशन विजय' ही कारवाई करून १९ डिसेंबर १९६१ रोजी हा प्रदेश भारतीय संघराज्याचा भाग बनवला. 


या छोट्याशा प्रदेशातील अनेक लोकांनी मागील तीनशे चारशे वर्षांच्या काळात पोर्तुगालला किंवा पोर्तुगीजांच्या वसाहती असलेल्या मोझांबिक, टांझानिया वगैरे ठिकाणी स्थलांतर केले होते.


सध्या पोर्तुगालचे पंतप्रधान असलेल्या अंतोनियो कोस्टा यांच्या आजोबांनीही असेच गोव्यातल्या मडगाव येथून मोझाम्बिक येथे स्थलांतर केले होते. गोवा, दमण आणि दीव या पोर्तुगीज वसाहतीतील लोकांना पोर्तुगालच्या नागरिकांनाप्रमाणे नागरी हक्क होते आणि पोर्तुगीज पासपोर्ट असायचा.  


गोवा, दमण आणि दीव भारताचा भाग बनला तेव्हा या प्रदेशातून पोर्तुगालला किंवा पोर्तुगालच्या इतर वसाहतीत राहायला गेलेल्या बहुतेक लोकांनी स्वतःचा पोर्तुगीज नागरिकाचा पासपोर्ट कायम ठेवणे म्हणजेच पोर्तुगालचे नागरिक म्हणून राहणे अधिक पसंत केले, 


त्यानंतर ते गोव्यात आणि भारतात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले ते परदेशी नागरिक म्हणूनच.  


अशा लोकांची संख्या प्रचंड होती. अर्थात यामध्ये कॅथोलिक लोकांचा भरणा अधिक होता हे साहजिकच होते.  


गोव्यातील हिंदू लोक उच्च शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा कॅरियरच्या शोधात मुंबई-पुण्याकडे वळत असत तसे इथले पाश्चात्य संस्कृतीकडे ओढा असलेले कॅथोलिक लोक लिस्बन किंवा इतर शहरांत जात असत.        


धर्मगुरु होण्यासाठी सत्तरच्या दशकात मी जेसुईटांच्या गोव्यातल्या मिरामार इथल्या प्री-नॉव्हिशिएटमध्ये दाखल झालो तेव्हा पोर्तुगीज राजवटीच्या इथल्या खूप खाणाखुणा अस्तित्वात होत्या. पोर्तुगीज पासपोर्ट असणारे आणि नोकरीनिमित्त पोर्तुगाल किंवा पोर्तुगीजांच्या पूर्वीच्या वसाहतीत राहणाऱ्या काही पालकांची मुलं माझ्याबरोबर या प्री-नॉव्हिशिएटमध्ये होती.  


साहजिकच पोर्तुगीज भाषेत बोलणे त्यांना जमायचे. विशेष म्हणजे यापैकी काही मुलं गोव्यात जन्मलेली होती तर काही चक्क पोर्तुगालमध्ये किंवा नैरोबी वगैरे शहरांत जन्मली होती.  


आमच्यासारखी ही मुलं भारतीय नव्हती, त्यांच्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट असल्याने माझे हे मित्र पोर्तुगीज नागरिक होते हे मला खूप, खूप उशिरा कळाले. 


वयाची २१ वर्षे पूर्ण होण्याआधीच म्हणजे सज्ञान होण्याआधीच यापैकी काही मुलं आपल्या भावंडांसह गोव्यातून भुर्रकन उडाली आणि आपल्या पोर्तुगीज पासपोर्टच्या आधारे लंडन वगैरे युरोपातल्या शहरांत स्थायिक झाली.  


सज्ञान झाल्यानंतरही त्यांनी गोव्यात राहायचे ठरवले असते तर त्यांना भारतीय पासपोर्ट म्हणजे नागरीकत्व घ्यावे लागले असते आणि याबाबत ही मुलं आणि त्यांचे आईवडील फार उत्सुक नव्हते. 


ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला अशा पद्धतीने पोर्तुगालमार्गे युरोपला, अमेरीका किंवा कॅनडाला स्थायिक झालेल्या माझ्या या मित्रांशी गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमांमुळे पुन्हा संपर्क झाला आहे. 


आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना भेटण्यासाठी ते चारपाच वर्षांतून एकदा येतात ते परदेशी नागरिक म्हणूनच. पोर्तुगालचे पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर अंतोनियो कोस्टा २०१७ ला गोव्याच्या भेटीवर आले होते तसे. 


गेल्या महिन्यात मी गोव्यात होतो तेव्हा सहज फिरताना पोर्तुगीज वकिलातीचे कार्यालय दिसले.  


गोव्यात अठरावा जून रोडवर पणजी चर्चजवळ असलेल्या पोर्तुगालच्या वकिलातीच्या कार्यालयात पोर्तुगीज पासपोर्ट म्हणजे नागरीकत्व मागण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या आजही खूप आहे.      


भारतीय वंशाचे असलेल्या ऋषी सुनक यांनी इंग्लंडच्या राजकारणात मारलेली झेप आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांचे उदाहरण आपल्या समोर आहेच.  


पणजीतले इंग्रजी दैनिक `द नवहिंद टाइम्स'चा बातमीदार असताना `गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टस' (गुज) चा मी सरचिटणीस होतो. तेव्हाची म्हणजे १९८६च्या आसपासची ही घटना.  


अखिल भारतीय पत्रकार महासंघ संलग्न असलेल्या अखिल भारतीय वृत्तपत्र कामगार महासंघाचे अध्यक्ष आणि शासननियुक्त पत्रकार आणि बिगरपत्रकार वृत्तपत्र कामगारांसाठी असलेल्या वेतन आयोगाचे सभासद असलेले कॉम्रेड एस. वाय. कोल्हटकर गोवा भेटीवर होते.


आणि गुज सरचिटणीस म्हणून मी त्यांचा यजमान होतो. 


डोना पावला येथे नव्यानेच सुरु झालेल्या पंचतारांकित हॉटेल सिदाद दि गोवा येथे `सिटु'चे दीर्घकाळ अध्यक्ष असलेले कॉम्रेड कोल्हटकर उतरले होते. तिथली त्यांची जीवनशैली पाहून मी चक्क झालो आणि त्यांच्या हातातली करड्या रंगाची `555' ब्रँडची परदेशी सिगारेट्स पाकिटे पाहून मी अगदी थक्क झालो. 


युरोपात रशिया आणि बल्गेरिया येथे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी असताना तिथे अशी जीवनशैली मी स्वतः अनुभवली होती. मात्र गोव्यात मी ``फोर स्क्वेअर’ या ब्रॅन्डचे एक रुपयाला दहा सिगारेट्स असणारे पाकीट मी विकत घेत असायचो.


`फाईव्ह फाईव्ह फाईव्ह’ हे महागडे सिगारेट कसे परवडते असा बालबोध प्रश्न मी विचारला तेव्हा आखाती देशात स्थायिक झालेला आपला मुलगा सिगारेट्सच्या पाकिटांचे कार्टन्स आणतो हे त्यांचे उत्तर ऐकले आणि मी सर्द झालो !      


(`उत्तुंग' या माझ्या व्यक्तिचित्रसंग्रहात ( 1993) कॉ. कोल्हटकर यांच्यावरही एक प्रकरण आहे.)


कामगार चळवळीत निस्वार्थपणे झोकून देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मला कॉम्रेड कोल्हटकरांच्या मुलाची परदेशात चाललेली कॅरियर माझ्या डोळ्यांत अंजन टाकणारी ठरली.  


त्यानंतर देशभर अख्ख्या कामगार चळवळीतील नेत्यांचे आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचे आदर्श असलेल्या साथी जॉर्ज फर्नांडिस यांचे चिरंजीव सिंगापूर कि इतर कुठे स्थायिक असल्याचे वाचले तेव्हा असाच धक्का बसला होता. 


नंतर असे धक्के पुन्हापुन्हा बसू लागले आणि जीवनात स्वतःबाबत आणि आपल्या कुटुंबियांच्या जबाबदारीबाबत अधिक जागरुक राहण्याची जाणिव अगदी वेळेत झाली.     


गोवा सोडून पुण्यात स्थायिक होऊन स्वतःचे बिऱ्हाड केल्यानंतर आणि मुलीच्या जन्मानंतर कानाला खडा लावला आणि कामगार चळवळीला कायमचा रामराम ठोकला.  


अहमदनगर जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या माझ्या थोरल्या भावाचे- कट्टर शिवसैनिक मार्शलआप्पा पारखे - याचे अखेर काय झाले याचा अतिशय कटु अनुभव मला स्वतःला होताच.   


अर्थात परदेशातली चांगली कॅरीयर सोडून भारतात परतणाऱ्यांची काही उदाहरणे आहेतच. 


माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या निधनानंतर भारताच्या राजकारणात त्यांची जागा घेण्यासाठी त्यांचे चिरंजीव अजित सिंग आपले परदेशातील वास्तव्य सोडून मायदेशी परतले होते. 


अर्थात अजित सिंग यांना आपल्या वडलांप्रमाणे देशपातळीवर स्थान मिळवण्यात अपयश आले आणि उत्तर प्रदेशातल्या एका छोट्याशा पट्ट्यात त्यांचा बालेकिल्ला राहिला आणि केंद्रात काही काळ मंत्रिपद त्यांना मिळाले.  


नवीन पटनाईक मात्र याबाबत यशस्वी ठरले. ओडिशाचे एकेकाळचे लोकप्रिय नेते आणि माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांच्या निधनानंतर परदेशात स्थायिक झालेले त्यांचे चिरंजीव नवीन पटनाईक भारतात परतले आणि ओडिशाचे चार वेळा सलगतेने मुख्यमंत्रीपद राखण्याचा विक्रम आज त्यांच्यावर आहे, 


याकाळात अगदी मोदी लाटेलाही त्यांनी ओडिशात थोपवले आहे. परदेशात राहिल्याने त्यांना त्यांची मातृभाषा असलेली ओडिशा भाषा चांगली बोलता येत नाही असे म्हणतात. 


आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे मुंबई-न्युयॉर्क या मार्गांवर विमान चालवणारे वैमानिक असलेले राजीव गांधी यांना अनिच्छेनेच भारतात आणि राजकारणात यावे लागले होते हे आपल्याला ठाऊक आहेच.   


मात्र परदेशातला निवास संपवून भारतात येऊन अशी महत्त्वाची सत्ताकेंन्द्रे भूषवणे सर्वांनाच शक्य होत नाही.    


मी स्वतः पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी पूर्व युरोपात बल्गेरिया येथे राहिलो, तिथली बल्गेरियन भाषा बोलण्याचे आणि सिरिलिक (रशियन) लिपी वाचायचे शिकलो,  


या दरम्यान रशियाचा दौरा केला. गोव्यात परतलो तेव्हा अनेकांनी मी `बल्गेरियात स्थायिक होण्याचा विचार केला नाही काय?'' असे विचारले होते. 


अशी अनेक उदाहरणे मला स्वतःला आणि इतरांनाही माहित आहेतच.     


काही महिन्यांपूर्वी आचार्य प्र. के. अत्रे यांच्या परदेशस्थित मुलीचे निधन झाले अशी बातमी वाचली. `मराठा' दैनिकाचे संपादक आचार्य अत्रे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक मोठे नेते. 


या चळवळीत हुतात्मे झालेल्या १०८ लोकांचे स्मारक मुंबईत आहे आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार अशी आवई उठली कि लगेचच या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करुन दिली जाते. 


तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले मुख्य नेते असलेल्या आचार्य अत्रे त्यांचे वंशज आता युरोपात स्थायिक आहेत हे ऐकले तेव्हा ``संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील या १०८ हुतात्म्यांचे वारस आज कुठे असतील आणि काय करत असतील?'' असा एक विचार मनाला सहज चाटून गेला.    


`महाराष्ट्र टाइम्स'चे दीर्घकाळ संपादक असलेले गोविंद तळवलकर आपल्या निवृत्तीनंतर परदेशात स्थायिक असलेल्या आपल्या मुलीकडे राहायला गेले होते आणि तेथून ते महाराष्ट्राच्या आणि भारतातल्या घडामोडींवर चिंतनात्मक लेख बरीच वर्षे लिहीत असत.  


समाजवादी नेते नानासाहेब तथा ना. ग. गोरे हेही वर्षांतून काही काळ परदेशातल्या आपल्या मुलीकडेच राहत असत. 


अशी कितीतरी उदाहरणे लोकांना माहित असतील.   


गोव्यात अनेक गावांत परदेशात स्थायिक असलेल्या गोंयकारांची मोठमोठी घरे बेवारस स्थितीत आहेत आणि त्यांच्यावर `लँड माफियां'चा डोळा आहे. यावर चाप लावण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारने पावले उचलली आहेत.  


पुण्यात भांडारकर रोड सारख्या अनेक परिसरांत जुन्या घरांची अशीच स्थिती असेल.


आपल्या देशात अगदी अलीकडच्या काळापर्यंत समुद्रगमन करणे अर्थात परदेशी जाणे निषिध्द होते. 


विलायतच्या दौऱ्यावरुन परतल्यावर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना त्याबद्दल प्रायश्चित घ्यावे लागले होते. 


आता तसे काहीही आपण मानत नाही. परदेशी शिक्षणासाठी वा नोकरीसाठी जाणे आता कौतुकास्पद असते. 


व्यवहारात शहाणी असलेल्या लोकांना आपला भलेपणा कशात आहे याची जाणीव असते आणि त्यानुसार ते निर्णय घेत असतात. 


भावनेच्या भरात वाहत जाणारी माणसे नंतर मग आपल्या नशिबाला बोल लावत बसतात, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 


गेल्या काही वर्षांत अनेक भारतीयांनी देशातले आपले चंबुगबाळे आवरुन परदेशाची वाट धरली आहे, याची आकडेवारी बाहेर आली आहे.  


यात नवल, धक्कादायक किंवा वाईट असे काही नाही.     


Camil Parkhe, July 22, 2022

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे