ब्रिटिश कालीन भारत , क्षत्रिय आणि आत्ताचे काही प्रश्न
श्रीधर तिळवे नाईक
भारतीय इतिहास लिहिताना आत्तापर्यंतच्या इतिहासकारांनी ज्या काही चुका केल्या त्यातील एक चूक म्हणजे ब्रिटिश काळाचा इतिहास लिहिताना फक्त ब्रिटिशांचा आणि त्यांच्या शासनाला विरोध करणाऱ्या स्वातंत्र्याची चळवळ करणाऱ्या लोकांचा इतिहास लिहिला वास्तविक यादरम्यान एक घटक होता जो या ब्रिटिश राजवटीचा पुरेपूर फायदा घेत होता लाभार्थी होता. हा घटक होता या देशातले ब्रिटिशांच्या आधीचे राज्यकर्ते जे ब्रिटिशांच्या तालावर ब्रिटिशांच्या काळात नाचत होते आणि त्यांच्या त्यांच्या प्रदेशात अंशिक प्रमाणात का होईना पण राज्य करत होते इतकेच नव्हे तर हे राज्य करताना ते पेन्शन सुद्धा घेत होते तनखा घेत होते किंवा काही रक्कम सुद्धा घेत होते. त्यांचा या साम्राज्यशाही शोषणामध्ये वाटा होता की नाही हा साधा प्रश्न सुद्धा आपल्याकडे विचारला जात नाही त्याचे कारण आपली सर्वांची या काळासंदर्भातली मनोवृत्ती ही दोन पद्धतीने डिझाईन झालेली आहे ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभाराकडे लक्ष जाऊ नये म्हणून क्षत्रियांच्या मार्फत होणाऱ्या राज्यकारभाराबाबतीतही फार काही विरोध होणार नाही याची काळजी जास्तीत जास्त या काळात घेतलेली दिसते त्याचबरोबर हे लोक जितके आपले क्षत्रियत्व जपतील तितके ब्रिटिशांना हवे होते कारण एक वर्ग जो शासनकर्ता वर्ग होता तो गप्प राहणार होता आणि त्याचे गप्प राहणे ब्रिटिशांना राज्य करायला अधिक मोकळीक देणार होते कारण या देशातल्या लोकांना वैष्णव धर्माने पसरवलेल्या वर्णव्यवस्थेमुळे लढण्यासाठी सुद्धा क्षत्रिय प्रमुख लागतो याची त्यांना कल्पना होती एकदा का क्षत्रिय थांबवले की आपोआप लढे थांबतात असे हे गणित होते
या काळात आपण बारकाईने पाहिले तर सामाजिक विद्रोह आणि राजकीय विद्रोह असे दोन प्रकारचे विद्रोह या काळामध्ये अस्तित्वात होते आणि या देशातले क्षत्रिय स्वतः तर राजकीय विद्रोह करतच नव्हते पण या काळातला सामाजिक विद्रोह हा आपल्याकडे न वळता तो फक्त ब्राह्मण वर्णाकडे वळेल याची काळजी घेत होता जेणेकरून क्षत्रिय लोकांची जी काही ब्रिटिशांच्या संदर्भात पापे झाली त्यापासून मुक्त राहील महात्मा फुले यांनी यासंदर्भामध्ये ब्राह्मण,- ब्राह्मणेतर वाद निर्माण करत एका अर्थाने ब्रिटिशांना खूप मदत केली आणि त्यांच्यामुळेच पुढे अनेक राज्यकर्त्यांना आपले सर्व आणि आपल्या पूर्वजांचे सर्व दोष ब्राह्मणवादाच्या नावाखाली झाकता आले आणि आम्ही ज्या चुका केल्या त्या आम्हाला ब्राह्मणांनी मार्गदर्शन केल्यामुळे आमच्याकडून आणि आमच्या पूर्वजांच्याकडून झाल्या असे भासवायला सुरू केले आम्ही जे काही केले ते सर्व चुकीचे होते आणि ते सर्व ब्राह्मणांनी केले किंवा ब्राह्मणांच्या मुळे केले अशा प्रकारचा अपप्रचार या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विशेषत: महाराष्ट्रामध्ये झालेला दिसतो त्यामुळेच या काळातल्या महाराष्ट्रातल्या सर्व संस्थानिकांच्या कारभारांची वस्तुनिष्ठ चिकित्सा झालीच नाही मात्र आता काळ निघून गेलेला आहे त्यामुळे कोणालाही ब्लेम न करता अशी चिकित्सा होणे ही एक अत्यंत आवश्यकता आहे कारण संपूर्ण शैव समाज या काळामध्ये कळत नकळत त्या त्या राजाशी बांधिलकी मानत जगत होता आणि या बांधिलकीचा सर्वाधिक तोटा हा शैव धर्माला झालेला आहे या काळामध्ये वैष्णव हे स्वातंत्र्यलढ्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये दाखल झालेले दिसतात आणि याचा पूर्ण फायदा वैष्णववादाला झाला यानंतरच विठ्ठलाच्या दिंड्या मोठ्या झाल्या
दुसरा एक विद्रोह हा अर्थातच राजकीय विद्रोह होता आणि तो सुरुवातीला ब्राह्मण लोकांच्या या संस्थानांच्या काळात ज्या होत्या त्या पोस्टस गेल्या त्या संदर्भात होता कधी नव्हे ते ब्राह्मण बेकार झाले आणि शासकीय कोट्यामध्ये त्यांना ज्या जागा असत त्यांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी होत गेली साहजिकच त्यांना ब्रिटिश शासन व्यवस्थेत वाढत्या जागा हव्या होत्या आणि काँग्रेसची स्थापना त्यासाठीच झाली होती याचे कारण पूर्वी जे संस्थानिक 100 नोकऱ्या निर्माण करत होते ते आता ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये फक्त 30 किंवा 40 च नोकऱ्या निर्माण करत होते साहजिकच जवळजवळ 70 नोकऱ्या ज्या मधील किमान 35 नोकऱ्या ह्या ब्राह्मणांना मिळत होत्या त्या आता खालसा झाल्या आणि साहजिकच काही ब्राह्मण असे होते ज्यांना त्या जागांच्यावर आपलाच जन्मदत्त हक्क आहे असे वाटत होते आणि हा जन्मदत्त हक्क कळत नकळत हालला होता
ब्रिटिश राजकारणी लोकांना जेव्हा कळाले की हे सर्व कशासाठी होते तेव्हा त्यांनी ब्राह्मणांना जागा करून द्यायला सुरुवात केली मात्र आवश्यकतेपेक्षा ह्या जागा कमीच देता येईल याची काळजी त्यांनी घेतली कारण त्यांच्या पुढचा प्रश्न ब्रिटिश लोकांच्या बेकारीमधलाही होता शेवटी त्यांना त्यांच्या देशातल्या अनेक जागा या भारतामध्ये देणे भाग होते म्हणजेच भारतातल्या किमान दहा टक्के जागा ह्या ब्रिटिशांनी परराष्ट्रीय लोक म्हणून व्यापून टाकल्या होत्या म्हणजेच ब्राह्मण आणि क्षत्रिय समाजातल्या जागा कमी झाल्या होत्या आणि राज्यकर्ते जिथे जिथे क्षत्रिय होते तिथे तिथे या सर्व जागा आपल्या क्षत्रिय समाजाला खुश ठेवण्यासाठी क्षत्रियांनाच दिल्या जात होत्या आणि कळत नकळत ब्राह्मणांच्या जागा थोड्या कमी होत होत्या
ब्राह्मणक्षत्रियेतरांना त्यामुळेच सर्व जागा द्याव्यात की न द्याव्यात असा एक फार मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्यातूनच आजचा ओबीसी वर्ग कळत नकळत तयार होत गेला या काळातील वैश्य लोकांचे पिढीजात व्यवसाय आटत गेले होते त्यामुळेच तेली असो की वाणी असो कळत नकळत ओबीसी वर्गामध्ये विलीन होत चालले होते
नवीन औद्योगिक युग आणि व्यापारी युग आले खरे पण त्यामुळे पारंपारिक व्यवसाय पूर्णपणे बोंबलायला लागले आणि जेव्हा हे सर्व पारंपारिक व्यवसाय सुद्धा नवीन औद्योगिक तंत्रा सकट आत्मसात करणे आवश्यक होते नेमके त्याच वेळेला शूद्र आणि वैश्य लोकांनी नवीन तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली याचा सर्वाधिक फायदा हा पार्शि व्यापाऱ्यांना झाला अपवादात्मक वेळेला ब्राह्मण लोकांनी सुद्धा नवीन व्यवसायात प्रवेश केलेला दिसतो म्हणजे नाट्य आणि चित्रपट सृष्टीत झालेला ब्राह्मणांचा प्रवेश याशिवाय ब्रिटिश लोकांचे कारखाने सुरूच होते अपवादत्मक वेळेला इतर ब्रिटिशे तर युरोपियन लोक सुद्धा कारखाने टाकत होते तिथे असणाऱ्या नोकऱ्या ह्या सुद्धा अनेकदा ओबीसी लोकांना उपलब्ध नव्हत्या आणि असल्या तरी त्यांची संख्या खूप कमी होती किंवा शारीरिक कष्टाच्या होत्या या सगळ्या प्रकारामुळे ओबीसी अधिकाधिक दरिद्री होत गेला औद्योगिक क्रांतीमुळे जगभरात शेतीवर जगणाऱ्या कामगारांचा बोजा कमी होत असताना भारतात मात्र नेमक्या उलट्या गोष्टी घडल्या म्हणजे सर्व ओबीसी आणि बीसी यांना शेती करण्याची वेळ आली आणि शेतीवरची पोटे वाढली यासंदर्भामध्ये भारतातील क्षत्रिय लोक नेमके काय करत होते असा प्रश्न आता विचारण्याची गरज आहे चौथ्या नवतेच्या इतिहासामध्ये ब्रिटिश काळ म्हणजे फक्त ब्रिटिश नव्हे तर ब्रिटिशांच्या हाताखाली काम करणारे सर्व संस्थानिक आणि त्यांचे शासन आणि त्यांच्या हाताखाली काम करणारा शासक वर्ग हा नेमका काय करत होता हे सुद्धा आता ऐतिहासिक पातळीवर तपासणे आवश्यक आहे भारतातील क्षत्रिय लोकांनी स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आपल्या जमिनींच्या बाबतीत ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपण आता नीट तपासल्या पाहिजेत म्हणजे एवढे मोठे राजवाडे उभे करायला लागणारे पैसे यांना नेमके कुठून मिळाले हा प्रश्न आता विचारण्याची वेळ नक्की झालेली आहे कम्युनिस्ट लोकांनी खरे तर हे प्रश्न विचारायला हवे होते पण आपल्याकडचे कम्युनिस्ट कधीच राजवाड्यांच्यावर मोर्चा घेऊन गेले नाहीत त्यामुळेच कम्युनिस्टांची लोकप्रियता कधीच वाढली नाही जी सरंजामशाहीची गंडस्थळ होती ती फोडण्याची जबाबदारी कम्युनिस्ट हत्तीवर होती पण साम्यवादाचा ह्या देशामध्ये कधीही हत्ती झाला नाही हे लोक फक्त माओ वर बोलत राहिले पण त्याच्याकडून प्रत्यक्षात हे काहीही शिकले नाहीत आणि जे शिकले तो एक उथळ प्रकार होता मुळातच चायनीज मॉडेलची या देशांमध्ये गरजच नाही भारतातल्या कम्युनिस्ट लोकांना एक भारतीय मॉडेल निर्माण करता यायला हवे होते पण तसे झाले नाही मुळात तशी प्रज्ञाच कोणाकडे नव्हती याचे कारण या देशाचे मूळ स्वरूप मोक्षिक आणि धार्मिक आहे आणि मोक्ष व्यवस्था आणि धर्म व्यवस्था हीच या देशाचा कणा आहे हे या लोकांच्या कधी लक्षात आले नाही ते बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर लक्षात आले होते म्हणूनच त्यांनी नवयान योजना केली पण प्रत्यक्ष लोकसंख्येमध्ये याला भूतकाळच अस्तित्वात नव्हता तो तसा आहे असे त्यांनी गृहीत धरले परिणाम असा झाला की स्वतःच्या समाजामध्ये सुद्धा त्यांना हे यान पसरवता आले नाही उरले होते फक्त समाजवादी ! त्यांचे 50 टक्के बळ हे आपापसात लढण्यातच वाया गेले शिवाय वर्ण संघर्ष की वर्ग संघर्ष हे शेवटपर्यंत त्यांना ठरवता आले नाही.
या सगळ्या गोष्टींच्या मुळे ब्रिटिश काळाचा इतिहास हा नीट लिहिला गेलेला नाही आणि त्यामुळेच स्वातंत्र्योत्तर भारतातला काँग्रेस कालखंडाचा इतिहास अजूनही स्पष्ट झालेला नाही भाजपच्या लोकांनी निर्माण केलेले सर्वच प्रश्न म्हणजे काहीतरी अडाणी प्रश्न आहे अशी एक समजूत काही लोकांची झालेली आहे खरे तर ज्यांना जेन्यूइन म्हणता येईल असे पाच टक्के प्रश्न हे लोक नक्कीच विचारत आहेत पण त्यांना त्या प्रश्नांना काही नीट आकार देता येत नाही त्याचे कारण ते स्वतःच ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन वर्णांचे आणि त्यांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यात गुंतलेले आहेत वास्तविक लोकमान्य टिळक हे या देशातील कदाचित असे पहिले नेते होते ज्यांनी काही प्रश्न थेट क्षत्रियांना विचारले होते दुर्दैवाने त्यांनी वेदोक्त प्रकारात हा सगळा स्टान्स घेतला आणि मूळ प्रश्नांचा सत्यानाश केला त्यानंतर क्षत्रियांना प्रश्न विचारणे लोक विसरून गेले मुळात शाहू महाराजांना सयाजीराव गायकवाड यांना हे प्रश्न विचारायलाच नको होते कारण हे असे क्षत्रिय होते जे आदर्श राज्यकर्ते होते म्हणजे वेळ तर चुकलीच पण जागा पण चुकली मुळातच क्षत्रिय हे प्रस्थापित ब्रिटिश व्यवस्थेचा भाग होते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे प्रस्थापित म्हणून ते नेमके कसे काम करत होते याचे नीट निरीक्षण आणि परीक्षण झाले पाहिजे कारण अनेक राज्यकर्त्यांनी अलीकडे आपल्या जुन्या जागा परत मागायला सुरुवात केलेली आहे या जागा आपल्याला नेमक्या कोणत्या कारणामुळे मिळाल्या हा प्रश्न मात्र ते विचारू देत नाही ते तिथे वारसा हक्क असे कारण देतात पण हा वारसा हक्क ठरवला कोणी कुठल्या व्यवस्थेने हा प्रश्न मात्र तुम्ही विचारायचा नसतो काँग्रेस राजवटीत ही जुनी व्यवस्था ब्रिटिशांची जर असेल तर ती काँग्रेसने का मोडून काढली नाही असा प्रश्न काँग्रेसला करता येतो किंबहुना नेहरूंना हा प्रश्न विचारायला पाहिजे पण नेहरूंना काहीतरी फालतू प्रश्न विचारायचे असा उद्योग चालू असतो नेहरूंचे योगदान हे निर्विवाद योगदान आहे परंतु केवळ राजकारण करायचे म्हणून जर का तुम्ही प्रश्न विचारणार असाल आणि प्रत्यक्षात तुम्हाला ज्यांचे हितसंबंध सुरक्षित करायचे आहेत त्यांच्यासाठी काम करत असाल तर मग तुमचे प्रश्न टोकदार वाटणे शक्य नाही हे सर्व संस्थानिक लोक काँग्रेसच्या मागे नंतर का उभे राहिले हा प्रश्न एकदा विचारायला हवा आणि या प्रश्नाचे उत्तर या सर्व संस्थानिक लोकांचे सर्व प्रकारचे आर्थिक हितसंबंध काँग्रेस व्यवस्थित सांभाळत होती हे त्याचे उत्तर आहे नेहरू माओ नव्हते आता हे चांगले की वाईट हे प्रत्येकाने ठरवावे पण निदान प्रश्न तरी निर्माण करा की नेमके या देशांमध्ये काय घडले आणि आत्ता सुद्धा नेमके काय घडत आहे आपण पुन्हा एकदा नवे सरंजामदार तर निवडून देत नाही आहोत ना हा सुद्धा प्रश्न आता जनतेने स्वतःला विचारावा मुख्य म्हणजे यामध्ये जनतेने स्वतःचे काय भले आहे हाही प्रश्न विचारावा म्हणजे मग डोनाल्ड ट्रम्प नावाचा महासरंजामदार कळू शकतो लोकांचा लोकशाही वरचा विश्वास उडत चालला आहे की लोकांनाच लोकशाहीची गरज वाटत नाही असा प्रश्न 21 व्या शतकामध्ये निर्माण झालेला आहे अन्यथा इतके निर्बुद्ध आणि लहरी नेते जगात सर्वत्र राजकारणाच्या केंद्रस्थानी आले नसते या सगळ्याचे बीज नेमक्या कोणत्या प्रकारच्या साम्राज्यवादात आहे हे सुद्धा आता नीट तपासले पाहिजे कारण पुरोगामी व्यवस्था ही व्यापारी सरंजामवाद आणि साम्राज्यवाद घेऊन आली होती तर आधुनिकता ही औद्योगिक क्रांतीनंतर कार्पोरेट सरंजामवाद आणि साम्राज्यवाद घेऊन आलेली आहे प्रश्न असा आहे की ती अत्यंत जाणीवपूर्वक नवीन सरंजामदार जन्माला घालत आहे की जनताच कार्पोरेट रचनेविरोधात या सरंजामदारांना जन्म देत आहे ? मुख्य म्हणजे अशा प्रकारचे नेते जनतेच्या बाजूने खरोखर लढणार आहेत का ? आज चौथ्या नवतेमध्ये नेट म्हणजे महाजालीय साम्राज्यवादाची सुरुवात झालेली आहे ट्रम्प यांच्या लहरी सरंजामवादी वृत्तीत हा नेट साम्राज्यवाद नेमका काय पद्धतीने ऑपरेट होत आहे हेही आता तपासले पाहिजे सरकारी जमिनी नेमक्या काय पद्धतीने खाजगी कार्पोरेट हाऊसेसना वाटल्या जात आहेत ? या काही राजकारणी लोकांच्या जमिनी आहेत काय ? जे कर्ज चढते ते जनतेच्या डोक्यावर चढते की राजकारणी लोकांच्या डोक्यावर चढते असा प्रश्न एकदा जनतेने विचारायला हवा परंतु जनता अजूनही स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश काळातील सरंजामी मानसिकतेत आहे असे आता दिसते आहे म्हणजे मग पुरोगामी वाद संपूर्णपणे फेल गेला की काय ? आणि जर पुरोगामी वादाचा प्रोजेक्टच कम्प्लीट होत नसेल तर मग तो कम्प्लीट होणार तरी कधी आणि जनता सरंजामवादी मानसिकतेतून बाहेर येणार कधी ? मानवेतर सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण अचानक पुढे सरकत जातो मग पुरोगामी व्यापारी क्रांती होते औद्योगिक आधुनिक क्रांती होते मग कार्पोरेट क्रांती होते मग आंतरजालीय क्रांती होते पण माणूस मात्र तिथेच थांबलेला दिसतो हा माणूस नेमका थांबलाय म्हणजे कशात थांबलाय आणि त्याला कोण थांबवत आहे ? कामगारांचे कायदे रद्द करण्याचा अर्थ कामगारांना आठ तासाऐवजी 12 तास थांबवणे असा असतो तर हे कोण थांबवत आहे ? की लोक स्वतःहून गुलामगिरी मध्ये चालत जात आहेत ? धर्म हा नेहमीच सरंजामशाहीवादी होता नंतर व्यापारही तसाच झाला आणि नंतर उद्योगही तसाच झाला आणि आता आंतरजाल सुद्धा तसेच होते की काय अशी शंका यायला लागलेली आहे हे जर असेच राहणार तर मग माणूस पुढे सरकतो म्हणजे काय होते आणि थांबतो म्हणजे काय होते ?
श्रीधर तिळवे नाईक
ब्रिटिश , क्षत्रिय आणि आरक्षणाचा प्रश्न भाग दुसरा श्रीधर तिळवे नाईक
जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सुरु करता तेव्हा तिचा शेवट कसा करायचा हेही तुम्हाला ठरवता आले पाहिजे जर का तुम्हाला त्या गोष्टीचा शेवट दिसत नसेल तर मग सामाजिक जीवनात ही गोष्ट अत्यंत प्रक्षोभकारी ठरते आरक्षण ही गोष्ट अशी ठरत चाललेली आहे आणि ती वारंवार भविष्य काळामध्ये प्रक्षोभ वाढवत नेणारी संताप वाढवत नेणारी ठरणार आहे.
आरक्षणाचे कारण माझ्या मते भारतीय वर्ण आणि जाती व्यवस्थेने निर्माण केलेली विषमता नष्ट करणे हे आहे भारतीय वर्ण आणि जात ही सामाजिक व्यवस्था प्रथम ब्राह्मण मग वैष्णव आणि शेवटी हिंदू या धर्मांनी भारतीय समाज व्यवस्थेत निर्माण केली वाढवली जोपासली आणि प्रस्थापित केली गेल्या ९०० वर्षांमध्ये ती प्रचंड प्रमाणामध्ये आपला विस्तार करत राहिली आणि उत्तर पेशवाई मध्ये तिने तिला पाहिजे तसा आकार धारण केला उत्तर पेशवाई मध्ये हा आकार ब्राह्मण केंद्रीय होतात तो मात्र नंतर बदलत गेला कारण ब्रिटिशांची राजवट होय ही राजवट अचानक वैश्य संस्कृतीला पुढे घेऊन आल्यामुळे वैश्य संस्कृती बाबत पुन्हा एकदा नवा विचार करणे ब्राह्मण लोकांना भाग पडले आणि त्यातूनच या सनातन व्यवस्थेचे स्वरूप बदलणे भाग आहे हे ब्राह्मण केंद्री विचाराला लक्षात आले हा विचार विशेषता त्यात घडलेला बदल लक्षात घेऊनच अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो
उत्तरपेशवाईनंतर या उत्तर पेशवाईने निर्माण केलेली सामाजिक व्यवस्थाच ब्रिटिश लोकांनी भारताची सामाजिक व्यवस्था म्हणून स्वीकारल्याने तिला एक प्रकारे राज्यमान्यता मिळाली तिचे पूर्वीचे स्वरूप मौखिक होते पण हळूहळू ब्रिटिश शासनामध्ये ती लिखित आणि पुढे छापीलही होत गेली आणि याचा प्रचंड दुष्परिणाम होत गेला कारण मौखिक परंपरेमध्ये तिला हलवता येणे व्यक्तिगत पातळीवर सहज शक्य होते कोणीही आपला वर्ण जात स्थलांतर करून बदलू शकत होता परंतु ब्रिटिश काळामध्ये हे सर्व लिखित झाल्याने अशा प्रकारचे वर्ण स्थलांतर आणि जात स्थलांतर नष्ट झाले म्हणजेच ब्रिटिश व्यवस्था ज्या व्यक्तीवादासाठी इंग्लंडमध्ये डिंगा मारत होती तीच व्यवस्था भारतामध्ये मात्र व्यक्तीचे स्वातंत्र्य संपूर्णपणे उध्वस्त करून गेली भारतात वर्ण आणि जातीवाद इतक्या प्रचंड प्रमाणात बोकाळला की त्याला काही पाय बंद राहिला नाही आज सुद्धा ब्रिटिशांच्या नंतर जे आरक्षण दिले जाते ते ब्रिटिशकालीन कागदपत्रांच्या वर अवलंबून असते किंवा गोव्यामध्ये पोर्तुगाली कागदांच्यावर ! ब्रिटिश म्हणजे व्हाईट मुघल नव्हते तर व्हाईट पेशवाई होती जिचा आरंभ एतददेशीय पेशवाई व्यवस्थेत होता आणि हे सत्य व्हाइट मोगल लिहिणाऱ्या लोकांना कळले नाही
एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आरक्षणाची सुरुवात मुस्लिम लोकांनी त्यांच्या धर्मासाठी स्वतंत्र आरक्षण मागून केली धार्मिक आरक्षणानंतर ब्रिटिशांनी वर्ण आणि जात यांच्या आधारे आरक्षण दिलेले नाही हे लक्षात घेण्याजोगे आहे अशा प्रकारचे आरक्षण शाहू महाराजांनी दिले म्हणजेच एका कलोनियल फिनॉमिनाला असा देशीवादी संस्कार मिळाला साहजिकच यामध्ये गोंधळ उडणे अटळ होते
मुळातच आपण ऐतिहासिक मागवा घेत इतिहासाला बारकाईने पाहिले तर या आरक्षणाची सुरुवात प्रथम ब्राह्मणांनी केली असे दिसते त्यांनी स्वतःसाठी पुरोहित म्हणून शंभर टक्के आरक्षण निश्चित केले आणि हे आरक्षण निश्चित व्हावे त्याला राज्य व्यवस्थेचे आणि राजाची सेना आणि इतर सर्व गोष्टी यांचे बळ मिळावे म्हणून त्यांनी क्षत्रियांना सुद्धा शंभर टक्के आरक्षण देऊन ब्राह्मणांच्या सारखेच तेही जन्मदत्त करून टाकले त्यामुळे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांना आरक्षण मिळाले पुढे मग जेव्हा वैश्य अशी कॅटेगिरी युरेशियन पातळीवर भक्कम होत गेली तशी आपल्याच युरेशियन वैश्य लोकांना त्यांनी शंभर टक्के आरक्षण देऊन टाकले आणि आणि उरलेले सर्व केवळ सेवेसाठी आणि गुलामगिरी म्हणून शूद्र आणि अस्पृश्य या कॅटेगरीमध्ये ढकलून दिले तर आदिवासी बाहेर असल्यामुळे त्यांना अवर्ण करून टाकले या व्यवस्थेमधूनच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विषमता निर्माण झाली अर्थात युरोपमध्ये सुद्धा अशा प्रकारचीच विषमता होती फक्त ती गुलामगिरीच्या पातळीवर निर्माण झाली होती तर मुस्लिम राजवटींच्या मध्ये गुलामगिरीच्या पातळीवर ती सर्वच पातळीवर सर्व प्रदेशांच्या मध्ये होती त्यामुळे इथे आलेल्या मुस्लिमांना किंवा ब्रिटिशांना अशा प्रकारची व्यवस्था अगदीच अनोळखी नव्हती उलट या वेगळ्या आणि अद्भुत प्रकारच्या गुलामगिरीचा कसा फायदा घेता येईल याच दिशेने हे लोक विचार करत होते कारण शेवटी तेही ते राज्य करायला आले होते गुलामगिरी करायला आले नव्हते तर गुलाम बनवायला आले होते
आता एका आरक्षणाचा विनाश करण्यासाठी म्हणून मग दुसरे आरक्षण जन्मले
याबाबतीत शाहू महाराज इतके आग्रही होते की त्यांनी ब्राह्मणांचे शंभर टक्के आरक्षण मोडून टाकावे म्हणून वैदिक धर्मामध्ये ब्राह्मणेतर पुरोहितगिरी निर्माण व्हावी म्हणून वैदिक शाळा काढली हा आर्य समाजाचा परिणाम होता पण मुळात जर ब्राह्मणेतर पुरोहितांचा धर्मच वैदिक नव्हता तर ते वैदिक शाळेत का जातील ? तो काळच असा होता की जिथे तिथे सर्वांना वेद दिसत होते त्या उलट जे वैदिक धर्मांच्या बाहेर होते अशा सर्व म्हणजेच शैव ,जैन आणि बौद्ध धर्मामध्ये पुरोहित कुठल्याही वर्ण आणि जातीचा असू शकत होता आमच्या नाईक घराण्यामध्ये सुरुवातीला नाईक मराठा म्हणून मराठा नंतर व्यापार करतात म्हणून वैश्य असे वर्ण दिले गेले असले तरी आमचे पुरोहितपण मात्र कधीही नाहीसे झाले नाही कारण आम्ही शैवधर्मी पुरोहित होतो आता आम्ही वेद कधीच शिकलो नाही अपवाद फक्त पाशुपत दर्शनाची जी माझ्या घरात परंपरा होती ती अपवाद कारण जो आचार्य होई त्याला मात्र सर्व शिक्षण घ्यावे लागे आणि ते घरातच मिळत होते आता अशा बहुजन परंपरेमधून आलेल्या पुरोहिताने वेद का शिकावेत ? शैव धर्मामध्ये मुळातच हा धर्म संस्कृतपूर्वी जन्मल्याने भाषेविषयी कसली सक्ती नाही आणि जे काही धार्मिक विधी आहेत ते स्थानिक भाषेतच म्हणजेच देशी, पोटी आणि जमाती भाषेतच सांगायला पाहिजेत अशी आज्ञा आहे आणि बहुतेक शैव पुरोहित हे करत असत अपवाद फक्त आचार्य आणि पंडित लोकांचा होता त्यांना मात्र संस्कृत वापरण्याची अनुमती होती किंबहुना आचार्य आणि पंडित लोकांनीच संस्कृत भाषा प्राकृत भाषेपासून बनवलेली होती ती ब्राह्मणांची भाषा कधीच नव्हती ती फक्त ऋग्वैदिक ऋषींनी नंतर स्वतःसाठी स्वीकारली कारण आपल्याला भारतामध्येच राहावे लागणार आहे हे त्यांना कळून चुकले होते
पंडितांनी ही संस्कृत भाषा विकसित केली आणि ब्राह्मणांनी ती वाढवत नेली त्यामुळेच संस्कृती भाषा पंडित सुद्धा शिकताना दिसतात त्यामुळेच शंकराबद्दलचे अनेक लिखाण हे देशी भाषेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोक धर्मामध्ये लोकसाहित्य म्हणून उपलब्ध आहे आणि पंडितांच्या लिखाणांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे अगदी आदिवासी लोकांच्यातसुद्धा हे लिखाण मिळते त्यामुळे वैदिक धर्म शिकला पाहिजे ही कसोटी लावली तरी शैव पुरोहित ते का शिकतील?
मुळात सर्व शैव मंदिरे ही बहुजन समाजाला परत केली पाहिजे ते खरे तर आरक्षण मोडून काढले पाहिजे पण ते करण्याला खूप मोठे धाडस लागते ते धाडस मला वाटत नाही कुठल्या शासनामध्ये आहे फक्त दक्षिणेत म्हणजे आता कर्नाटक तेलंगण आंध्र प्रदेश तामिळनाडू इथेच कदाचित ते शक्य झाले तर होईल किंबहुना त्या दिशेने तामिळनाडू ने पाऊल टाकलेले आहे आणि अलीकडे केरळ शासन सुद्धा काही पाऊल उचलत आहे
या आरक्षण व्यवस्थेमध्ये ब्राह्मणांच्यापेक्षा ज्यांना जास्त फायदा झाला असा दुसरा वर्ण म्हणजे क्षत्रिय वर्ण होय तो वर्ण व्यवस्थेचा सर्वात मोठा लाभार्थी आहे हेच अनेकांच्या लक्षात येत नाही त्याला काही करून जन्मदत्त राज्य हवे असते कारण आपल्या मुलांनाच आपल्यानंतर राज्य मिळावे अशी त्यांची इच्छा असते ही इच्छा हे त्यांचे मागणे इतके नैसर्गिक मानले गेले होते की जणू काय ते अंतिम सत्य आहे किंबहुना जगातल्या जन्मदत्त आरक्षणाचा आरंभ हा कळत नकळत राज्य सत्तेचे वांशिक स्थलांतर या सत्त्यात आहे ब्राह्मणांनी फक्त धर्म स्थापन करून आपलीही सोय करून घेतली. त्यासाठी क्षत्रिय आणि ब्राह्मण यांचे आरक्षण निश्चित केले आणि गेली हजार वर्षे ते व्यवस्थित चालवून दाखवले याला अधून मधून धक्के मिळाले तरी ज्याला महा धक्का म्हणावा असे काहीही घडले नव्हते अगदी मोगल यांच्या राजवटीत आणि इतर मुस्लिमांच्या राजवटीत सुद्धा हे आरक्षण जसेच्या तसेच होते शिवाय यातील अनेक लोक स्वतःला राजे म्हणवून घेत . म्हणजे औरंगजेबाचा मनसबदार असून सुद्धा जयसिंग स्वतःला मिर्झाराजे जयसिंगच म्हणवून घेत होता यातून त्यांना कसले समाधान मिळत होते हे तेच लोक जाणोत.
या सर्वांच्या हितसंबंधाला धक्का लागू नये म्हणून ब्रिटिश लोकांनी सुद्धा त्यांचे राजेपण हिसकावले नाही त्यामुळे ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये सुद्धा हे सर्व लोक क्षत्रियच राहिले या लोकांना स्वातंत्र्यानंतर वीस वर्षे धक्का लागला नाही कारण मुळात लोकशाहीत काय होणार याची कल्पना कोणालाच येत नव्हती शिवाय मुळात जनतेमध्ये त्यांच्याबद्दल प्रेम असल्यामुळे आणि जनता वर्णवादी असल्यामुळे त्यांचा राजे म्हणूनच आदर करत होती पण हळूहळू लोकशाहीमध्ये जे निवडून येणारे लोक होते ते समांतर क्षत्रियत्व निर्माण करत होते आणि इथूनच खरा संघर्ष सुरू झालेला आहे जोपर्यंत लोकशाही व्यवस्था वर्णस्थ असलेल्या क्षत्रियत्वाला धक्का वाट लावत नव्हती तोपर्यंत संघर्ष करण्याची वेळ कोणावरच यायची शक्यता नव्हती महाराष्ट्र मध्ये मराठ्यांची जोवर सत्ता होती तोवर सर्वकाही व्यवस्थित चाललेले होते
या सगळ्याला धक्का मंडल आयोगाने दिला क्षत्रिय आणि ब्राह्मण लोकांना अस्पृश्य आणि भटक्या समाजाला आरक्षण मिळत होते त्याबद्दल कधीही फारसा प्रॉब्लेम नव्हता पण 1990 नंतर अचानक ओबीसी समाजाला सुद्धा आरक्षण मिळाले आणि हा समाज आतून कणखर शैव असल्यामुळे आव्हान देऊ शकतो याची कल्पना हळूहळू सर्वांनाच यायला लागली
1990 पर्यंत एससी आणि एसटी यांना जरी आरक्षण मिळाले होते तरीसुद्धा अनेकदा त्यांची संख्या दिसत नव्हती कारण अनेकदा जागा भरल्या जात नव्हत्या पण हळूहळू १९९० नंतर या लोकांच्या सीटा सुद्धा आता व्यवस्थित भरल्या जाऊ लागल्या आणि इथूनच खरे प्रॉब्लेम सुरू झाले म्हणजे शासनामध्ये जो ब्राह्मण आणि क्षत्रिय चेहरा स्पष्ट आणि स्वच्छपणे दिसत होता तो हळूहळू दिसेनासा होऊ लागला इतकेच नव्हे तर राजकीय आरक्षण निर्माण झाल्याने अनेक मतदारसंघांमध्ये ओबीसी आणि बीसी राजवटी यायला सुरुवात झाली संघर्षाची वेळ आली की ओबीसी आणि बीसी एकत्र येतात विशेषता आरक्षणाचा प्रश्न आला की हेही हळूहळू स्पष्ट व्हायला लागले ओबीसी 52% आणि एससी एसटी 20% असे 70% जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय करायचे असा फार मोठा प्रश्न निर्माण होतो कारण आता वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था इतक्या मोठ्या लोकसंख्येचे काहीही वाकडे करू शकत नाही साहजिकच मग १९९५ नंतर ओबीसी आणि बीसी एससी एसटी यांच्यामध्ये फूट कशी पाडता येईल या दिशेने प्रयत्न सुरू झाले
मुळातच १९९०पूर्वी मराठा समाज वेगळा आणि कुणबी समाज वेगळा असे व्यवस्थित मानले जात होते अपवाद होते पण ते अपवादच होते पण अचानक कुणबी ओबीसी आरक्षणामध्ये आले आणि मराठा या समाजापुढे अनेक प्रश्न निर्माण झाले
नेमक्या याच वेळी मराठा समाज जो प्रामुख्याने शासकीय समाज होता हा शासनामधून विस्थापित होऊ लागल्याने अधिकाधिक शेतीवर अवलंबून राहत अधिक शेतीनिष्ठ होत गेला आणि नेमकी हीच वेळ होती ज्या वेळेला जागतिकीकरण आले या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये शेतीची दुर्दशा होत गेली आणि मराठा समाजाच्या उत्पन्नामध्ये प्रचंड घट होत गेली याला तुकडे करण आणि वाढलेली लोकसंख्यासुद्धा जबाबदार होते शिवाय शैक्षणिक मागासलेपणा ही जबाबदार होता जो मराठा समाज नवीन आलेल्या युगाला अतिशय व्यवस्थितपणे सामोरा गेला तो स्वतःला अधिकाधिक मराठा 96 कुळी म्हणवून घेऊ लागला पण ज्याला अशा प्रकारे उन्नती प्रगती करता आली नाही त्याला मात्र आता मराठा म्हणून स्वतःची पत टिकवणे हळूहळू अवघड बनू लागले या जागतिकीकरणाचा नेमका उलटा फायदा ब्राह्मणांना मिळाला कारण शैक्षणिक दृष्ट्या ते अधिकाधिक पुढारत गेले. त्यांनी चौथी नवता अतिशय फास्ट वेगाने आत्मसात केली साहजिकच या नवतेने जे व्यवसाय निर्माण केले ते सर्वच्या सर्व हळूहळू ब्राह्मण पादांक्रात करत गेले यातून ब्राह्मण उद्योगपती आणि ब्राह्मण सी इ ओ उदयाला येऊ लागले त्यामुळे ब्राह्मणांच्या चेहऱ्याला अजिबात धक्का लागला नाही याउलट क्षत्रियांच्या चेहऱ्याला मात्र व्यवस्थित तडा जाऊ लागला डार्विन चा adaptation चा सिद्धांत इथे लागू होतो स्वतःला ऍडप्ट करण्यात क्षत्रिय समाज विशेषत: त्यातला ग्रामीण समाज कमी पडू लागला आणि यातूनच क्षत्रियवर्णांमध्ये सुद्धा हळूहळू गरीब वर्गाची संख्या वाढत गेली आणि आजचा जरांगे यांनी निर्माण केलेला प्रश्न हा त्यातून निर्माण झालेला प्रश्न आहे
मुळातच शासन व्यवस्था आणि अर्थव्यवस्था या दोन वेगळ्या गोष्टी असतात त्या धार्मिक सरंजामवादी किंवा अगदी पुरोगामी काळामध्ये एकमेकांशी इंटरलॉकड असल्या तरी त्यांचे फंक्शनिंग आधुनिक आणि उत्तराधुनिक काळामध्ये वेगळे चालते
यामुळेच १९९० नंतर शासन व्यवस्था ही मंडल आयोगामुळे अधिकाधिक खुली होत गेली आणि त्याचा फटका प्रामुख्याने मराठा समाजाला पडला ब्राह्मण लोकांना हे हवे होते कारण त्यांना सुद्धा या काळात क्षत्रियांचे वर्चस्व सर्वत्र संपवायचे होते. अलीकडे मात्र ब्राह्मण धर्माला आता फक्त असे क्षत्रिय हवे आहेत जे वर्णव्यवस्था स्वीकारतील आणि स्वतःला वैदिक किंवा ब्राह्मण धर्मीय म्हणवून घेतील
जरांगे यांचे आंदोलन धगधगत राहणे हे त्यामुळेच ब्राह्मण धर्माला आवश्यक वाटतं कारण ते एकदा तसे राहिले की कोण स्वतःला ९६ कुळी मराठा म्हणूवून घेत आरक्षण नाकारत वैदिक आणि ब्राह्मण धर्माची पाठराखण करते हे स्पष्ट होत जाईल म्हणजेच जे आरक्षण घेणार नाहीत ते क्षत्रिय ठरतील आणि जे आरक्षण घेतील ते हळूहळू कुणबी होत शूद्र ओबीसी लोकांच्यात जमा होत जातील ब्राह्मण धर्माचा हा तिढा इतका सोपा नाहीये आणि दुर्दैवाने तो कुणालाच कळत नाही म्हणजे मागणी कोणाची आणि फायदा कोणाला ? त्यामुळेच हा प्रश्न जितका भिजत ठेवता येईल तितका तो ब्राह्मण धर्माला आवश्यक आहे कारण त्यांना ब्राह्मण हे कॅटेगरी स्पष्ट होत चालली आहे अनेक शैव पंडित ब्राह्मण म्हणवून घेतात अपवाद आमच्या तिळवे घराण्यासारखे आहेत जे सातत्याने नकार देतायेत आणि पंडित आहोत आणि वैश्य आहोत असे ठाम पण सांगतात त्यांना सुद्धा वारंवार आता मूळ ब्राह्मण धर्मात या असे सांगितले जात आहे माझ्या स्वतःच्या सर्टिफिकेटवर सुद्धा त्यामुळेच ब्राह्मण अशीच जात आहे एकदा का हा साधारणपणे सहा टक्के ब्राह्मण वर्ण प्रस्थापित झाला की मग क्षत्रिय वर्ण सुद्धा प्रस्थापित करता येऊ शकतो जरांगे यांचे आंदोलन हे त्या दृष्टीने अत्यंत उपकारक ठरत आहे ब्राह्मण आता फक्त इथेच थांबत नाहीत ते सर्वच ब्राह्मणेतर पुरोहितांना हळूहळू ब्राह्मण वर्णात या असे आवाहन करतील असा माझा अंदाज आहे तसे झाले तर साधारणपणे ही संख्या नऊ टक्के होईल प्रश्न आता क्षत्रिय लोकसंख्येचा आहे त्यामध्ये सर्व मराठा, जाट , राजपूत , शीख अशा लढणाऱ्या शैव समाजांचा समावेश केला तर ही लोकसंख्या साधारणपणे वीस ते पंचवीस टक्के होईल म्हणजेच स्वतःला ब्राह्मण म्हणवणारे 9% आणि स्वतःला क्षत्रिय म्हणवणारे 25% शिवाय जैन आणि वैश्य मिळून चार टक्के आहेतच त्यात काही असे ओबीसी आहेत ज्यांना वैश्य होण्यामध्ये आता मजा येत आहे ते दोन टक्के येतीलच उदाहरणार्थ तेली हा समाज स्वतःला पुन्हा एकदा वैश्यवर्णांमध्ये सामील करू इच्छितो असे मिळून साधारणपणे 42% युरेशियन धर्म मानणारे लोक तयार झाले की भारतातील ब्राह्मण धर्मी सत्ता ही व्यवस्थितपणे कायमची कंटिन्यू राहू शकते कारण 58% आहेत ते सतत एकमेकांशी भांडत राहतील याची खात्री युरेशियन लोकांना आहे त्यातील काही जण पुन्हा ब्राह्मणीकरण होत वैदिकीकरण होत युरेशियन धर्मांना मिळत आहेत आणि इतिहास पण तसाच आहे आता भविष्यात जर का मुस्लिम लोकांच्या मधील पुरोहित सैनिक आणि व्यापारी लोक जर भाजपाला मिळाले तर काय होऊ शकते याचा अंदाज घ्या म्हणजे मग या देशांमध्ये काय चालले आहे हे नीट कळेल नाही कळाले तर भविष्यात एक नवी गुलामगिरी तुमची वाट पाहत आहे चायना मध्ये एक पार्टी व्यवस्था आहे अशी सिंगल पार्टी व्यवस्था भारतामध्ये आणता येईल का या दिशेने ही चाचपणी सुरू आहे
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment