विनोद कुमार शुक्ल : विधान छंदाचा अभूतपूर्व कवी गेला श्रीधर तिळवे नाईक 


विनोद कुमार शुक्ल गेले ते कवितेच्या इतिहासामध्ये नेमके कुठे उभे आहेत हे कळायचे असेल तर प्रथम आपणाला कवितेचा छंदात्मक इतिहास तपासला पाहिजे .


कवितेच्या इतिहासामध्ये जगातल्या जवळजवळ सर्वच धारांच्या मध्ये टोळ्यांच्या मध्ये कवितेची सुरुवात ही नेहमीच मात्रा छंदाने झाली कारण तिथे केवळ सामुदायिक लिखाण नव्हते तर सामुदायिक गायन आणि नृत्य सुद्धा केले जाई. पुढे मग पंडित लोक घुसले आणि त्यांनी लोकपरंपरा बाजूला करून वृत्तछंदात म्हणजे अक्षरगणवृत्तात लिहायला सुरुवात केली. साहजिकच कविता म्हणजे ती छंदातच असली पाहिजे अशी धारणा अभिजात पंडिती परंपरेमध्ये घट्ट होत गेली आणि अभिजात परंपरा कायमच आपला हट्ट लोकपरंपरेवर लादण्याचा प्रयत्न करू लागली परंतु लोक परंपरेने कधीही त्याला दाद दिली नाही . यादृष्टीने मराठीतील पंडिती कवी बघण्याजोगे आहेत. आणि त्यांना समकालीन असणारे शाहिरी वाङ्मय बघावे .


त्यानंतर भारतातल्या संतांच्यापैकी मराठी परंपरेमध्ये मराठी संतांनी काही प्रमाणात एक वेगळा मात्रा छंद विकसित केला तो म्हणजे अक्षरी अभंग होय ह्यात मात्रा मोजण्याऐवजी अक्षरे मोजली जात होती. आठ किंवा सहा किंवा दहा अक्षरी लिहिणे हे त्यामुळेच उदयाला आले. मी अर्थातच हीच गोष्ट सुनिता मध्ये वापरली होती आणि अक्षरी सुनीत निर्माण केले होते ते माझ्या क.व्ही या संग्रहामध्ये आहे. (मराठी समीक्षकांना अजूनही आपल्या परंपरा नीट कळत नाहीत जिथे परंपराच नीट कळत नाही तिथे त्यांना नवता नीट कळावी अशी अपेक्षा का करावी? किंबहुना मराठी समीक्षक हा कवितेबाबत अडाणी असतो असा माझा अनुभव आहे) 


पुढे मग युरोपमध्ये पुरोगामी कवितेचा कालखंड सुरू झाला आणि या पुरोगामी कवितेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य स्वच्छंद होते . स्वच्छंद दोन प्रकारचा होता पहिला प्रकार वृत्तछंदात आणि मात्रा छंदात थोडी सैलता आणू इच्छित होता काही काही वेळा तरी स्वच्छंदीशैली खूपच सैल होत गेली. उदाहरणार्थ आपण नारायण सुर्वे यांची ऐसा गा मी ब्रह्मा किंवा माझ्या विद्यापीठ मधली कविता जर घेतली तर त्यामध्ये हा स्वच्छंद जबरदस्त रीतीने आलेला दिसतो. ज्यांना कोणाला स्वच्छंद समजून घ्यायचा आहे त्यांनी नारायण सुर्वे यांच्या कविता नक्की वाचाव्यात अर्थातच त्यांच्या आधी अशा प्रकारच्या कविता वॉल्ट व्हिटमन या अमेरिकन कवीने अभूतपूर्व पद्धतीने लिहिल्या आहेत त्याच्यावर मी स्वतंत्र लेख त्यामुळेच लिहिला होता . आपल्याकडे सदानंद रेगे यांनी अतिशय उत्तम मानावा असा त्याच्या कविताचा अनुवाद केलेला आहे. तो रसिकांनी पहावा .


स्वच्छंदाचा दुसरा प्रकार वृत्त आणि मात्रा ऐवजी थेट तालावर आधारित ताल छंद निर्माण करत येत होता . आपल्याकडे या प्रकारच्या अत्यंत अद्भुत कविता पु.शि रेगे यांनी लिहिलेल्या आहेत उदाहरणार्थ पुष्कळा किंवा झाडावर जे गाणे पक्षी गातो किंवा माझ्याजवळ होते या ताल छंदाचा विस्तार काही ठिकाणी दिलीप चित्रे यांनी अतिशय सुंदर केला . मी स्वतःही ताल छंदात काही कविता नंतर लिहिलेल्या आहेत. त्यासाठी मुळात तुम्हाला तबला येत असेल तर उत्तम किंवा मग तबल्याचे निदान भान तुमच्याजवळ असायला लागते. अर्थातच याबाबतीतले दुसरे कवी विंदा करंदीकर आहेत त्यांनी सुद्धा अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या आणि आधुनिकतेच्या अंगाने ताल छंदातल्या कविता लिहिल्या . म्हणजे आपण असे म्हणू शकतो की पु शि रेंगे यांची कविता ही पुरोगामी ताल छंद आहे तर निंदा करंदीकर यांची कविता ही आधुनिक ताल छंद आहे . दिलीप चित्रे यांनी मग उत्तराधुनिक ताल छंद शोधला असे म्हणता येते . अर्थातच त्याकडे जितके लक्ष त्यांनी द्यायला हवे होते तितके दिले नाही मी याबद्दल त्यांच्याशी बोललेलो होतो . पण अडचण मुळात पु शी रेंगे आणि विंदा करंदीकर यांनीच करून ठेवलेली आहे या लोकांना जे साधले आहे ते पुन्हा पुन्हा साधणे हे इतके सोपे नाही . पुढे पुढे तर चित्रपटांच्या गाण्यांमध्ये हे आले म्हणजे अच्छा तो हम चलते है किंवा निसर्ग राजा ऐक सांगतो यातील निसर्ग राजा हे माझे अत्यंत आवडते तालछंदातले गाणे आहे . 


यानंतर अर्थातच मग आधुनिक कविता आली आणि ह्या कवितेने ज्याला आज आपण मुक्त छंद म्हणतो तो छंद आणला याबाबतीत जो पायोनियर होता तो वॉल्ट विटमन होता आणि त्याला आता हे श्रेय निर्विवाद पण हे दिले जाते आधुनिकतेने हा फक्त उजवला नाही तर रुजवला वाढवला आणि आज हा कवितेचा मुख्य छंद बनलेला आहे. साहजिकच मग या मुक्तछंदाचा प्रभाव पडून पारंपारिक आणि पुरोगामी अशा मात्रा छंदाचा वृत्तछंदाचा स्वच्छंदाचा ढाचा अधिकाधिक मुक्त करण्याचा प्रयोग सुरू झाला आणि जगभर मग मुक्त सुनीत उदयाला आले आपल्याकडे मुक्त सुनीताची रचना अत्यंत सर्वोत्कृष्ट पद्धतीने विंदा करंदीकर यांनी केलेली आहे . ही धारा पुढे विलास सारंग आणि दिलीप चित्रे यांनी फार सुंदर रीतीने पुढे नेली . मुक्तछंदाचा अप्रतिम वापर हे आधुनिक आणि देशीवादी लोकांचे फार मोठे वैशिष्ट्य होते जगभरातच एकंदर या काळामध्ये मुक्त गझल मुक्त सुनीत मुक्त हायकू असे प्रकार उदयाला आलेले दिसतात .


आधुनिकतेनंतर उत्तर आधुनिकतेने नवीन प्रयोग केले आणि त्यामध्ये दोन प्रयोग अतिशय महत्त्वाचे होते पहिला प्रयोग हा गद्यात्मक कवितेचा होता आणि दुसरा प्रयोग हा विधान छंदाचा होता. अर्थातच आधुनिक ताल छंद सुद्धा नंतर उदयाला आला आणि आपणाला त्याचे अप्रतिम दर्शन अरुण कोलटकर यांच्या "अरुण कोलटकर यांच्या कविता"या नावाच्या संग्रहात दिसते. पु शि रेंगे यांचा ताल छंद दिलीप चित्रे आणि विशेषता अरुण कोल्हटकर यांनी प्रचंड पुढे नेला याबाबत शंका असू नये मुख्य म्हणजे अरुण कोलटकर यांनी तो ताल छंद आधुनिक केला आणि पु शी रेगे यांच्या पुरोगामी ताल छंदाच्या छायेतून मराठी कवितेला बाहेर काढले . या अंगाने दुसरी एक अतिशय महत्त्वाची आलेली कविता म्हणजे विलास सारंग यांची उद्देशिका ! अर्थातच या अंगाने आणखी एक जमून गेलेली कविता म्हणजे हेमंत जोगळेकर यांची होड्या ( मला पुष्कळ होड्या येतात वैगरे) मराठी घाबरट मध्यमवर्गाच्या प्रेमी असलेल्या लवर बॉय चे हे मस्त प्रकटीकरण होते . त्यात एक इनोसन्स होता आणि घाबरटपणा आणि भंबेरी उडणे ही होते . त्या उलट दिशेची ताल छंदातली कविता म्हणजे विलास सारंग यांची उद्देशिका ही कविता !


ऐंशोत्तर पिढी मधील कवितांचे जे काही वैशिष्ट्य आहे त्यामध्ये आपणाला ही गोष्ट सांगितली पाहिजे की याच लोकांनी आपला मध्यमवर्ग सहज स्वाभाविकपणे स्वीकारला (याबाबतीत ग्रंथालीने काढलेल्या काव्यसंग्रहाला पहावे त्या त्या प्रश्नांची नीट चर्चा झालेली आहे ज्या प्रश्नांची चर्चा झालेली नाही ते प्रश्न मी इथे घेत आहे माझ्या पिढीतल्या आणि विशेषता माझ्या नंतरच्या पिढीतल्या कवींनी जरा पुन्हा एकदा या पिढीच्या मर्यादांचा अभ्यास केला पाहिजे असे हल्ली मला तीव्रतेने वाटते)प्रश्न असा आहे की यांच्यापैकी कोणालाच विनोद कुमार शुक्ल यांची उंची का गाठता आली नाही ? याचे त्या काळात मला सापडलेले जे उत्तर होते ते असे की विनोद कुमार शुक्ल तत्त्वज्ञान पचवून बसलेले होते आणि अशा प्रकारचे तत्त्वज्ञान पचवून बसण्याचा उद्योग या कवींनी केला नाही . तत्त्वज्ञानामुळे एक जे स्वतंत्र दर्शन आणि काव्य दर्शन प्राप्त होते त्यापासून हे लोक वंचित झाले आणि त्यामुळेच यांच्यापैकी कोणालाही विनोद कुमार शुक्ल यांची उंची गाठता आली नाही. प्रश्न असा आहे की मराठी मध्यम वर्गाचा हा खुजेपणा आहे का ? या पुढचा प्रश्न हिंदी मध्यम वर्गाची तात्विक उंची ही मराठी मध्यम वर्गाच्या तात्विक उंचीपेक्षा अधिक आहे का ? मी स्वतः हिंदी बेल्ट मध्ये अनेकदा हिंडलेलो आहे आणि मला हा प्रश्न अनेकदा पडलेला आहे. तत्त्वज्ञानाची खिल्ली उडवणे हा मराठी मध्यमवर्गीय लोकांना पु ल देशपांडे यांच्यापासून मिळालेला रोग आहे . कळत नकळत या लोकांचा आधुनिक रोमांस देखील पारंपारिक रोमँटिसीजमच्या प्रभावाखाली जातो विनोद कुमार शुक्ल असे रोमँटिक होत नाही ते आधुनिक जीवनशैलीच्या संदर्भात प्रकट होत राहतात आणि इथेच ते उंची गाठण्याचे सगळे कसब प्राप्त करतात त्यामानाने आपण जर का याच पिढीतले मराठी कथाकार बघितले म्हणजे उदाहरणार्थ सतीश तांबे यांची कथा बघितली तर ते अधिक प्रगल्भ आहे हे स्पष्ट दिसते .


उत्तर आधुनिक कालखंडामध्ये गद्यात्मक कविता ही स्पष्टपणे गद्य म्हणूनच येत होती . तर विधान छंदामध्ये कवितेमध्ये विधाने येतात पण कधी कधी ही विधाने गद्य न होता त्यांना एक विशिष्ट प्रकारची लय प्राप्त होते . उदाहरणार्थ द भा धामणस्कर यांची परंपरा ही कविता ! मराठीमध्ये अशी कविता अत्यंत प्रभावीपणाने लिहिली गेलेली आहे किंबहुना हिंदीच्या तुलनेत साठोत्तरी मराठी कवी लोक याबाबतीत अधिक स्मार्ट आहेत . नामदेव ढसाळ यांच्या मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले या काव्यसंग्रहामध्ये आपणाला गद्य कवितेचे काही उत्तम नमुने मिळतात. एका इतिहासाबाबत अडाणी असलेल्या कवीने याबाबतीत अलीकडे गद्य कविता लिहून जणू काय आपणच शोधली आहे असा दावा केला होता मी अर्थातच प्रतिवाद केला नाही कारण दरवेळेला कुठे प्रतिकार करत बसा. पाश्चात्त्य देशांमध्ये अनेक उत्तम गद्य कविता लिहिल्या गेल्या. मी स्वतः काही गद्य कविता लिहिल्या आहेत आणि चॅनल अंडरवर्ल्ड मध्ये अशा दोन गद्य कविता आहेत. पण अर्थातच मी कधी श्रेय घेतले नाही कारण मराठीत नामदेव ढसाळ यांनी आधीच या प्रकारचे काम केले आहे याची मला कल्पना होती आणि दुसऱ्यांचे श्रेय लाटणे माझ्या नैतिकतेत बसत नाही . आपण आपल्या आधी शोधली गेलेली गोष्ट अधिक विकसित करू शकतो आणि ती केलीच पाहिजे पण जर का ते श्रेय आपले नसेल तर ते आपण ते घेता कामा नये. कधी कधी अपवादात्मक वेळेला असे होते की मराठीत आपण सुरुवात करतो म्हणजे मराठीत मुक्त गजलेची मी सुरुवात केली असेल परंतु मुक्त गजलेची मी सुरुवात केलेली नाही ती आधीच उर्दूमध्ये कोणीतरी केलेली आहे हे सांगण्याचे कारण की हल्ली काही लोकांना नैतिकता नावाची गोष्ट मानवत नाही. अर्थातच चिन्ह गजलेची सुरुवात मात्र मी केलेली आहे जगात इतरत्र मात्र ती अजून मी पाहिलेली नाही उद्या जर काय कोणी त्या संदर्भात माझ्या काही लक्षात आणून दिले तर तेही श्रेय मी त्या व्यक्तीला देईन किंबहुना दिले पाहिजे अनेकदा जगातली सगळी कविता आपण वाचत नसतो आणि आपल्या अपरोक्ष अनेक प्रकार चाललेले असतात. अशा वेळेस इतिहास पुन्हा लिहावा लागतो आणि तो खुद्द स्वतःच्या बाबतीत पण असू शकतो .


 माझ्या आवडीचा दुसरा उत्तर आधुनिक प्रकार म्हणजे विधान छंद ! या प्रकारच्या कवितेमध्ये फक्त विधानाची विधानलय सांभाळत कविता निर्माण केली जाते . मराठीमध्ये वसंत आबाजी डहाके यांनी अशा प्रकारच्या काही कविता लिहिलेल्या आहेत . त्यांची मुक्तछंदातली अप्रतिम कविता म्हणजे योगभ्रष्ट होय . (त्यात गद्यात्मक कवितेचाही पडसाद आहे)पण अपवादात्मक वेळेला त्यांनी विधान छंद पण सांभाळलेला दिसतो . 


विनोद कुमार शुक्ल यांचे सर्वात मोठे यश जर कुठे असेल तर ते ह्या विधान छंदात आहे. मुळातच हिंदीमध्ये विधान छंद हा अतिशय उत्तम रित्या विकसित होत गेला . या छंदामध्ये केवळ विधानांनी कविता निर्माण केली जाते त्यामुळे अनेकदा ही कसली कविता हे तर गद्य आहे अशा प्रकारचे ऑब्जेक्शन येऊ शकते. पण मला वाटते की विनोद कुमार शुक्ल हे कदाचित एकमेव असे कवी असतील की ज्यांच्या कवितेवर असे ऑब्जेक्शन घेणे इतरांना खूप अवघड गेले. 


मुक्त छंद आणि विधान छंद असे दोन्ही प्रकार त्यांनी आपल्या कवितेत आजमावलेले दिसतात. आता त्यांची सध्या मृत्यूनंतर गाजत असलेली पुढील कविता घ्या. ही कविता पुढील प्रमाणे आहे .


जो मेरे घर कभी नहीं आएँगे

मैं उनसे मिलने उनके पास चला जाऊँगा। एक उफनती नदी कभी नहीं आएगी मेरे घर नदी जैसे लोगों से मिलने नदी किनारे जाऊँगा कुछ तैरूँगा और डूब जाऊँगा| पहाड़, टीले, चट्टानें, तालाब असंख्य पेड़ खेत

कभी नहीं आएँगे मेरे घर खेत-खलिहानों जैसे लोगों से मिलने गाँव-गाँव, जंगल-गलियाँ जाऊँगा।जो लगातार काम में लगे हैं मैं फ़ुरसत से नही उनसे एक ज़रूरी काम की तरह मिलता रहूँगा| इसे मैं अकेली आख़िरी इच्छा की तरह सबसे पहली इच्छा रखना चाहूँगा।


ही पाच किंवा सहा विधानांची कविता आहे पण अख्खा डावा विचार कोळून पिल्यासारखी ती येते. आणि तरीही पारंपारिक अर्थाने ती मार्क्सवादी नाही तर श्रमिक वादी आहे . एक भारतीय स्पर्श त्या कवितेला आहे. विधाने आहेत पण ती तोडून व्यवस्थित कवितेसारखी मांडलेली आहेत. त्यांच्या अशा अनेक कविता दाखवता येतील ही आणखी एक कविता पहा 

हताशा से एक व्यक्ति बैठ गया था

व्यक्ति को मैं नहीं जानता था


हताशा को जानता था

इसलिए मैं उस व्यक्ति के पास गया


मैंने हाथ बढ़ाया

मेरा हाथ पकड़कर वह खड़ा हुआ


मुझे वह नहीं जानता था

मेरे हाथ बढ़ाने को जानता था


हम दोनों साथ चले

दोनों एक दूसरे को नहीं जानते थे


साथ चलने को जानते थे।


आमच्या नव्वोदत्तरी पिढीमध्ये अनेक लोकांनी विधानात्मक कवितांची जी प्रेरणा घेतली ती हिंदी मधून आलेली आहे . विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा या प्रदेशातील कवी! आम्ही कोल्हापूर साईड आणि कोकण मधून आलेले कवी हिंदी पासून प्रभावीत नाही आहोत त्यामुळे आमचा विधानात्मक छंद हा वेगळ्या पद्धतीने डेव्हलप झाला (माझा तो युरोपियन कवींच्यामुळे डेव्हलप होत गेला)परंतु विदर्भ आणि मराठवाडा विशेषता विदर्भ हा अनेक वर्षे ब्रिटिश काळामध्ये हिंदी बेल्टशी निगडित असल्याने हिंदीच्या कवितांचा जबरदस्त प्रभाव त्यावर पडतो. हे लोक हिंदीला अकारण चढवून असतात आम्ही पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र वाले याबाबतीत अपवाद आहोत . आमचे सर्व काही दख्खन असते अर्थात देशीवादाच्या प्रभावाखाली आलेले कवी सोडून ते मात्र मुर्खासारखे आपली दख्खन परंपरा विसरतात आणि नेमाडे यांची मराठवाडा परंपरा किंवा विदर्भ परंपरा ते स्वीकारतात. 


साहजिकच तुम्ही जर का बारकाईने पाहिले तर विनोद कुमार शुक्ल यांच्या मृत्यूचे सर्वाधिक दुःख हे विदर्भातून आलेले दिसते आणि ते आलेच पाहिजे कारण हा एक अव्वल कवी होता याबद्दल शंका नाही . माझ्या स्वतःच्या आयुष्यात त्यांची कविता खूप उशिरा आली . पण मला असे अनेक कवी माहिती आहेत ज्यांच्यावर त्यांचा प्रभाव आहे .


ज्यांना कोणाला विधान छंद वापरायचा असेल त्याने विनोद कुमार शुक्ल यांची कविता एकदा तरी नीट वाचलीच पाहिजे असा माझा आग्रह असतो. मुख्य म्हणजे ते विधाने कशी तोडतात आणि कशी जोडतात ते कवितेच्या संदर्भात पाहिले पाहिजे त्याचा अभ्यास झाला पाहिजे. 


प्रश्न असा आहे की मग कविता त्यांच्यात विधानातून निर्माण कशी होते . तर अनेकदा विधान छंदामध्ये विधाने रूपकात्मक पद्धतीने मेटाफोरिकल सादर केली जातात आणि त्यामुळे ही रूपकात्मकता काव्य बनत जाते. अशा प्रकारची रूपकात्मता नसली की मग ती कविता कविता उरत नाही गद्य बनून जाते . त्या कवीचा केशवसुत होतो म्हणजे असे की केशवसुत फार अप्रतिमरित्या वृत्तछंदात किंवा मात्रा छंदात लिहायचे. पण तरीही रूपकात्मता कमी पडल्यामुळे ती कविता अनेकदा गद्य होऊन जायची . जिथे जिथे त्यांना यश मिळायचे तेव्हा मात्र ते त्या काळाचा विचार करता खूप भव्य असायचे म्हणजे झपूर्झा ही कविता ! 


विनोद कुमार शुक्ल यांचा केशवसुत झाला नाही आणि याचे कारण मुळात ते ज्या काळात आले होते त्या काळामध्ये कवींची कवितेविषयीची पुरोगामी ,आधुनिक आणि उत्तर आधुनिक समज वाढलेली होती. केशवसुतसुद्धा ज्या परिस्थितीत लढायचे लिहायचे त्या काळामध्ये कवितेविषयीची पुरोगामी समजच प्रस्थापित न झाल्याने त्यांना प्रथम ती समजच रुजवावी लागली आणि त्यामध्ये त्यांचा खूप वेळ वाया गेला मला तर अनेकदा असे वाटते की केशवसुत अधिक जगते तर ते फार काहीतरी उत्तम काम करून गेले असते पण दुर्दैवाने त्यांना इंग्लंड मधल्या कवींना मिळालेले स्वातंत्र्य आणि स्वतंत्र काळ पण मिळाला नाही आणि पुढे आयुष्य पण मिळाले नाही. 


विनोद कुमार शुक्ल यांना असा काळ मिळाला आयुष्य मिळाले. अनेकदा ते उत्तरपुरोगामी आशय आपल्या कवितेतून आणि कादंबरी मधून सुद्धा सादर करायचे परंतु त्याला एक उत्तराधुनिक टच असायचा . शमशेर या कवीने काही वेगळ्या अशा कविता हिंदीमध्ये लिहिल्या होत्या त्या कविता पुढे घेऊन जाणारी अशी त्यांची कविता होती. गजानन माधव मुक्तिबोध जसे स्वतःला श्रमिकांशी जोडून घेत होते तसेच शुक्ल सुद्धा जोडून घेतात परंतु आपला खास मध्यमवर्गीयपणा ते अजिबात लपवत नाही आणि इथेच ते गजानन माधव मुक्तीबोधांच्यापेक्षा वेगळे होतात . गजानन मुक्तिबोध काही झाले तरी आपण प्रोलीटरिएट वर्गाशी पूर्णपणे तादात्म पावले पाहिजे अशी निकराची भूमिका घेताना दिसतात विनोद कुमार शुक्ल असा प्रयत्न सुद्धा करत नाहीत. त्यांच्या कादंबऱ्यांच्या मध्ये सुद्धा ही सहजता आढळते . मराठीमध्ये ही मध्यमवर्गीय सहजता सहसा अनेकांना साधत नाही आणि तिथेच आपणाला विनोद कुमार शुक्ल वाचण्याची गरज निर्माण होते. 


ते गेले पण त्यांनी एक उत्तम कवितेचा उत्तम कादंबरीकाराचा वारसा आपल्यासाठी सोडलेला आहे . हिंदीमध्ये असा वारसा आमच्या पिढीमध्ये कोण पुढे नेतो आहे याचा एकदा आढावा घेतला पाहिजे. माझी त्यांना आदरांजली !


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे