अर्वाचीन स्वच्छंद वादी कवितेचा दुसरा जनक श्रीधर तिळवे नाईक 


श्रीधर हे माझे नाव माझ्या वडिलांच्या वडिलांचे असलेले पण मराठीत आपल्या नावाचे कुणी आहे का म्हणून शोध घेताना दोन श्रीधर सापडले आणि आश्चर्यकारकरीत्या दोघेही समकालीन लोकांच्या पेक्षा अधिक लोकाभिमुख होते . एकाने रामायण महाभारत व्यवस्थित आणले आणि दुसरा श्रीधर कुलकर्णी मात्र प्रचंड बंडखोर होता. त्याने ब्राह्मण असूनही सर्व काही धुडकावले आणि आपल्या पद्धतीने जीवनशैली निर्माण केली त्याने आपल्या कवितेत म्हटल्याप्रमाणे पूर्वाश्रमीच्या महारणीवर प्रेम केलं आणि त्यांचा रोमान्स हा खऱ्या अर्थाने रोमँटिक होता . अर्वाचीन होता कारण तो ब्राह्मण आणि महार या भारतीय समाजातील सर्वात उच्च आणि सर्वात निम्न असा दोन जातींच्या मधला लिविंग रिलेशन होता. अर्थातच हे सर्व शक्य होते याचे कारण तो शैव होता त्याचा पहिला साक्षात्कार वाराणशीलाच होता म्हणजे काशीला होता त्याच्या भाषेत विश्वेश्वर आणि रुद्र ! आपली ओळख करून देताना त्याने या दोघांचे नाव घेतलेले आहे शैव हे कायम कसे वेगळे असतात हा प्रश्न मराठीला पडत नसतो पण मला कायम पडत असतो कारण मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिणारे कायम वारकरी असतात किंवा वेदांती वैदिक ! त्याच्या आयुष्याची तुलना जर का आपण युरोपमधल्या रोमँटिक कविता लिहिणाऱ्या कवींशी केली तर कदाचित हा मराठी कवी त्यांच्यापेक्षा सरस जीवनशैलीचा वाटेल कारण तिकडे वर्ण जात नव्हती आणि आंतर वर्णीय आंतरजातीय नाते काय त्रासातून करावे लागते टिकवावे लागते याची कदाचित युरोपियन लोकांना कल्पना ही येणार नाही माझा स्वतःचा आजोबा याचा फॅन होता कारण आंतरजातीय विवाह करण्याचे धाडस माझ्या सुदैवाने माझ्या दोन्ही आजोबांनी केले माझा मातुल आजोबा हा चक्क प्रभू घराण्यातून बायको करून आणलेला होता माझी आजी ज्यांना आजकाल कायस्थ म्हणतात त्यांच्यातून त्यांच्यातून आली होती 


अर्थातच त्याचे लिजंड बनणे अटळ होते आणि तो बनला त्याचे नाव पठ्ठे बापूराव ! ब्राह्मण असूनही तमाशा करणारा आणि नामचंद पवळा नावाच्या तमासगिरीणीच्च्या प्रेमात पडलेला ! 


त्यांचा आणि केशवसुत यांचा जन्म 1866 सालीच व्हावा हा एक योगायोग (पठ्ठे बापूराव जन्म ११- ११- १८६६ आत्ताचा सातारा पूर्वीचा सांगली, गाव हरणाक्ष रेठरे )दोघेही ब्राह्मण परंतु दोघांनी दोन दिशा पकडल्या यामध्ये त्यांच्या धार्मिक पार्श्वभूमीचा वाटा किती हा एक फार मोठा विषय आहे . केशव सुत कायमच वेदांती राहिले पण वेदांती असणे सुद्धा त्या काळात पुरोगामी गोष्ट होती . पण पठ्ठे बापूराव खऱ्या अर्थाने क्रांतिकारक कारण त्यांची जीवनशैली क्रांतीकारक होती. ज्या काळात तमाशा अटेंड करणे गुन्हा होता त्या काळामध्ये त्यांनी खुद्द तमाशा केला आणि अतिशय मनापासून केला. एकदा लावणी लिहायला घेतली कि ती लिहूनच संपवायची आणि तिच्यात दुरुस्ती करायची नाही असा काहीतरी विचित्र बाणा त्यांचा होता. पैशाबाबत ही तेच प्रचंड उधळपट्टी करणारा स्वभाव हे त्यांचे वैगुण्य होते . त्यामुळे म्हातारपण अत्यंत हलाखीत गेले . बापूसाहेब जिंतीकर यांनी जर का त्यांच्या लावण्या प्रकाशित केल्या नसत्या तर कदाचित त्यांनी काय काम केले हे कळालेच नसते. त्यांनी मुंबई पुणे कोल्हापूर वगैरे सर्व शहरांच्या वर लावण्या लिहिल्या आणि ही अर्वाचीन सुरुवात होती . हे काम केशवसुत यांच्या कामाइतकेच महत्त्वाचे होते . त्यांना त्यांच्या गावाने बहिष्कृत केले यात आश्चर्य नाहीच त्यांना मोरे लोकांनी आश्रय दिला. 


पवळा ही त्यांच्या मनाची राणी ! साहजिकच तिच्याबरोबरच त्यांचा शृंगार त्यांच्या रचनांच्या मध्ये सुद्धा उतरला हा खरा रोमांस होता केशवसुतांच्या सारखा तो मध्यमवर्गीय नव्हता . 


त्यांच्या लिखाणाची सुरुवात अर्थातच ओवी पासून झाली होती मग ते कविता रचायला लागले. त्यांच्या घराच्या शेजारीच पूर्वाश्रमीच्या महारांचे राहणे होते आणि त्यांची लावणी कवने कानावर पडत होती घरचे नाव श्रीधर आणि ते केवळ कवी नव्हते संगीतकार पण होते . स्वतःच्या कवनाच्या संगीत रचना त्यांना सुचत . हळूहळू हलगी डफ अस्वस्थ करायला लागला आणि पुढे मग वाटचाल सुरू झाली. भवताली अत्यंत प्रेरणा देणारे असे औंध संस्थान होते. 


रेठरे हरणाक्ष माझे घर |

जंगली बाबांचा हात शिरावर|

त्यांनी पंथ दावीला राजयोग सुंदर |


अशी आध्यात्मिक विरासत त्यांनी सांगितलेली आहे . जंगली महाराज हे सद्गुरु होते आणि कट्टर योगी राजयोगी ! 


एक ब्राह्मणाचा मुलगा तमाशा सारख्या लोककलेच्या नादाला लागतो आणि अस्पृश्यांच्यात मिसळतो हे पचणे अवघडच होते त्यामुळे टीका सुरू झाली पण तमाशा ही पॅशन झालेल्या बापूराव कुलकर्णी म्हणजे श्रीधर कुलकर्णी या माणसाला काही स्वस्थ बसवेना . सुरुवातीला चोरून रचना पुरवणे सुरू होते नंतर हळूहळू उघड होत गेले . या रचना छंदात असूनही मुक्त होत्या उदाहरणार्थ 


लग्न लावले कुटुंब केले 

कळत असोनी टाकली उडी 


यामध्ये आठ मात्रांचे पादा कुलक आहे पण पुढे 


पायात बेडी बळे अडकवली 

येऊन बसल्या बारा नडी


यामध्ये पायात बेडी नऊ मात्रा आहेत येऊन बसल्या दहा मात्रा आहेत तर बारानडी सात मात्रा आहेत 


मला मुक्त गझल सुचण्यामध्ये या लोक परंपरेचा खूप मोठा वाट आहे . गाताना ह्या सर्व आठ मात्रा होऊन जातात . 


अर्थात हे करताना एके ठिकाणी ते म्हणतात 

वेदशास्त्र आणि पुराने वर्जुनी भलतीच वटा वटा 


एकंदरच हा वट वेगळा होता त्यांच्या भाषेत भलताच होता .


त्यांची देशाची लावणी कळत नकळत केशवसुतांच्या मार्गी परंपरेला दिलेला देशी छेद आहे स्वतःच्या अवकाशात ठाम उभे राहणे हे इथे चांगले साधले आहे 


पवळाबरोबरचा त्यांचा रोमान्स सुद्धा देशी पद्धतीनेच अवतरत राहिला 

त्यांच्याच भाषेत सांगायचे तर 

लाखो बायकात खरी ग देखणी 

तुझ्या ग वानी आम्ही नाही पाहिली कोणी ग 


अशी पवळा होती . 


आता अशा प्रेमप्रकरणात वर्ण संघर्ष जाती संघर्ष अटळ असतो तसा तो झाला आश्चर्य म्हणजे यामध्ये बहुजन समाज होता. हरिभाऊ किवलेकर हे पूर्वाश्रमीचे महार आणि भागुजी माळी यांनी पठ्ठे बापूराव कुलकर्णी यांना वाळीत टाकावे असा प्रस्ताव दिला . साहजिकच साथीदार मिळणे अवघड होऊन बसले कारण त्या काळामध्ये वाळीत टाकणे हे फारच कठोर असे .


ब्राह्मणाचा महार झाला असाही आरोप आला. बहिष्कार पडल्यामुळे साहजिकच फड उभा राहणे शक्य नव्हते विवंचना वाढत गेल्या 


शेवटी पट्टे बापूराव यांनी सर्वांना बोलावून विचारले की आमचे (म्हणजे पवळा आणि मी) काय करणार आहात 


तर समोरच्या लोकांनी विचारले की काय करावे तर मग त्यांनी सूचना दिली की आम्हा दोघांनाही विका 


शेवटी एलफिस्टन थिएटर चे मालक अबू सेट यांनी दोघांना दरमहा 900 रुपयांना विकत घेतले 


अर्थात सेठ पुढे प्रश्न आला की आता मायना 900 रुपये द्यायचे कसे तर पठ्ठे बापूराव यांनी सल्ला दिला की आम्हा दोघांना तुम्ही प्रदर्शनात उभे केल्यासारखे उभे करा आम्हाला पाहायला लोक येतील आणि लोक खरोखरच यायला लागले दरदिवशी 300 ते 400 रुपये उत्पन्न यातून उभे राहिले एकंदर शेठला फायद्याचा सौदा ठरला इतकी पवळाची क्रेझ होती . अर्थात ही गोष्ट आपल्या लोकांच्या मानसिकतेवर बराच प्रकाश टाकते 


यातून पुढे जे होणार होते ते झाले ते म्हणजे ब्राह्मण बाटला किंवा नाही बाटला यावर वाद सुरू झाले मारा माऱ्या झाल्या आणि कोर्टात केस सुरू झाली शेवटी यावर उत्तर म्हणून बापूरावाने कोर्टाला चक्क पीला हाऊस मधल्या तमाशाच्या फडात उभे केले एक फार्स सादर केला तेल्याच्या मेलेल्या बैलाचा फार्स असे त्याचे नाव होते . स्वतः स्टेजवरून मी महार झालो आहे असे समजा असे डिक्लेअर केले आणि शेवटी कोर्टाकडे फैसला गेला कोर्टाने निर्णय दिला की बाटवा बाटवी काही झालेली नाही .


या खटल्यामुळे पठ्ठे बापूराव प्रचंड गाजले मुंबईची लावणी ही नंतर आली जी प्रचंड गाजली आणि अर्वाचीन कवितेमध्ये तिचे एक स्थान आहे. नामदेव ढसाळ चा मानला गेलेला गोलपिठा प्रथम या मुंबईच्या लावणीत येतो याची अनेकांना कल्पना नाही . 


आत मधी किर्तन वरून तमाशा ही ओळसुद्धा बापूरावांची आहे लाखात अशी देखणी किंवा नटरंगी नार हे सुद्धा बापूरावांचेच कवन! 


अलीकडे जे ईश्वराचे अस्तित्व आहे की नाही हा डिबेट झाला त्या संदर्भात सुद्धा बापूरावांच्या फार उत्कृष्ट अशा दोन ओळी आहेत बापूराव लिहितात ,

"किती देवा तू कठोर मनाचा कोणाचे तू केले बरे 

जे का तुझ्या भक्तीशी लागले 

तितुक्यांची तू बुडवली घरे "


पुढे करवीर नगरीत शाहू महाराजांनी जेव्हा आमंत्रण दिले तेव्हा तिथे तमाशा करताना त्यांनी कोल्हापूरची लावणी रचली ती सुद्धा त्या काळाचे उत्कृष्ट प्रतिबिंब आहे 


शाहू महाराजांनी अर्थातच त्यांचा जरी फटका देऊन आणि सोन कडे देऊन गौरव केला पवळाला सोन्याचे दोन तोडे दिले


आणि मग पुढे मुंबईच्या बटाट्याच्या चाळीत दोघांचा अन ऑफिशियल संसार थाटला गेला . काही काळ हे सर्व उत्तम चालले परंतु एक दिवस कळत नकळत फेट्यासाठी म्हणून पवळाचे लुगडेच वापरले गेले आणि ठिणगी पडली नंतर मग दागिने गेले आणि हे दागिने तिच्याच लोकांनी लुटले होते साहजिकच घातलेली केस काढून घ्यावी लागली आणि इथे दुसरे मतभेदाचे कारण वाढू लागले. बापूरावांना शिक्षा दिली गेली पाहिजे होती असे वाटत होते तर पवळाला आहे ही सर्व माणसे तुरुंगात गेली तर तमाशा बंद पडला असता असे वाटत होते. जेव्हा दोन्ही लोक बरोबर असतात तेव्हा मग मतभेद मिटवणे फार अवघड जाते तेच इथे घडले तणतण वाढत गेली आणि एक दिवस पवळा निघून गेली 


जेव्हा दोघात मतभेद होतात तेव्हा तिसरा आपोआपच येतो मारुतीराव पाटील यांच्या निमित्ताने आपोआपच तिसरा पक्ष पवळाच्या आयुष्यात आला त्यांनी पवळाच्या सर्व अटी मान्य करून तिचा तमाशा उभा केला. दागिने जसे पूर्वी होते तसेच करून दिले . 


"द्यावा एक मुका चांगला "अशी कवनातून थेट किस ची मागणी करणारे पठ्ठे बापूराव कुलकर्णी हे मात्र पवळा गेल्यानंतर हताश झाले.


मग त्यांचा डर मधला शाहरुख खान झाला त्यांनी प्रथम पवळाला शेवटची आठवण म्हणत चार जरीची पातळे भेट दिली आणि नंतर पोलीस स्टेशनला त्यांच्या चोरीची तक्रार केली . प्रेमभंग झाला म्हणून असे काही करणे हे चुकीचे होते कळत नकळत तुम्ही प्रेमात सूड घ्यायला जाता पण असे सूड अंगलट येतात स्वतःला राजयोग दीक्षा घेतली म्हणणारे बापूराव कळत नकळत इथे मात्र चुकले. खरे तर बाई स्वतःच्या मर्जीने बाहेर पडून ती दुसऱ्याकडे गेली की आपण शांत पाठ फिरवावी आणि तिला मोकळे करावे पण काही प्रेमी लोकांना ते जमत नाही . यामागे अर्थातच पझेसिव्हनेस असतो . शेवटी मग 

सारा मायेचा बाजार 

तीन दिवसाचा गे भार

अशी उपरती त्यांना झाली 


पण पुढे पवळाचे आणि मारुतीरावांचे एका व्यक्तीने तिचा तमाशा मध्येच हात धरला यावरून बिनसले मारुतीरावांनी पण पोलीस स्टेशनात तक्रार केली पवळाने आपले दागिने चोरले अशी! पण पवळाने दागिने आपल्या नावाने खरेदी केल्याची पावती सादर केली आणि हा खटला जिंकला पुन्हा पठ्ठे बापूराव आणि पोवाडा एकत्र आले पुन्हा तमाशा सुरू झाला पुन्हा प्रेम पण 

खाली जमीन अंथरेण

वर आकाश पांघरेन


मानत सुरू झाले 


कुठल्याही प्रेमप्रकरणात विशेषता समाजमान्य नसलेल्या रोमँटिक प्रेम प्रकरणात समाज येतोच तसा तो इथेही आला अचानक गावकऱ्यांनी बापूराव यांच्यापुढे त्यांनी पुन्हा ब्राह्मण धर्मात परतावे असा आग्रह धरायला सुरुवात केली त्यासाठी 300 रुपयाची वर्गणी जमवली आणि त्यांनी काशीला जाऊन शुद्धीकरण करावे असाही बूट निघाला अर्थात एकदा का पठ्ठे बापूराव ब्राह्मण धर्मात परतले तर ते आपल्याला टाकतील अशी भीती पवळाच्या मनात निर्माण झाली जी एका अर्थाने त्याकाळची सामाजिक परिस्थिती बघता योग्य होती पण मला नेहमी वाटते की तिने थोडासा विश्वास ठेवायला हवा होता तिने गाव सोडले आणि मुंबईला आली बापूराव पुन्हा एकदा तिला समजावण्यासाठी आले परंतु कळत नकळत कुठेतरी ही भीती आता दगड बनली होती . साहजिकच पवळा हलली नाही आणि ती आपल्या गावी गेली 


इकडे बापूरावांनी नवा तमाशा उभा करण्यासाठी म्हणून प्रयत्न सुरू केले आणि ताई मरींचेकर हिच्याबरोबर फड उभा केला परंतु तो जितका चालायला हवा तितका चालला नाही कारण त्यात पवळा नव्हती . आपल्यामुळे फड चालतोय असे वाटणाऱ्या बापूरावांना हा धक्का होता . खरे तर दोघांच्यामुळे ही तो चालत होता परंतु आता हा फड चालेना . शेवटी मग पट्टे बापूराव यांनी 1836 मध्ये तमाशातून निवृत्ती घेतली 


इकडे पवळाची ही स्थिती वेगळी नव्हती शेवटी वय झाले होते आणि आजार बळवले होते साहजिकच आयुष्याच्या शेवटी तिला बापूरावच आठवायला लागले . त्यांचे तिच्यावर निस्सीम प्रेम होते आणि ते प्रेम आठवत शेवटी मुंबईत भावाकडे आलेल्या पवळ्याने 1936 यावर्षी प्राण सोडले 


ही प्रेम कहानी दोन्ही बाजूने तीव्र होती तिच्यात खरे होते नखरे होते एकमेकांवरचे जीवापाड प्रेम होते आणि सूड सुद्धा होते. 


त्या काळामध्ये व्हिडिओ शूटिंग फारसे प्रचलित नव्हते त्यामुळे आपणाला पवळाची कला माहीत नाही परंतु पवळाला एक गोष्ट नक्की माहिती होती ती म्हणजे त्यांच्या लावण्या नंतर टिकतील आणि गायल्या जातील . तसेच झाले .


पठ्ठे बापूराव आणि केशवसुत यांची आपण तुलना केली तर आपणाला एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे दोघांचीही शैली वर्णनपर आहे दोघांच्या जवळ कल्पनाविलास खूप कमी आहे अधून मधून तो डोकावतो परंतु तरीही आत्ताच्या काव्याच्या स्टॅंडर्ड च्या दृष्टीने तो कमी पडतो . रूपकात्मक ओळी फार कमी येतात त्यापेक्षा अधिक वास्तववादी सरळ पद्यात्म ओळी येतात . कळत नकळत त्याकाळची ही काव्यशैली होती आणि ती दोघांच्यातही दिसते . ज्योतिबा फुले यांच्यामध्येही हे दिसते . अर्वाचीन कवितेचा आरंभ हा ज्योतिबा फुले यांच्यामुळे झाला असला तरी आणि ते सुधारणावादी होते हे खरे असले तरी केशवसुत आणि बापूराव हे दोघेही एका अर्थाने रोमँटिक परंपरा आणत पुढे सरकले . मात्र पद्यात्मक लिहिणे कळत नकळत या तिघांच्याही लिखाणांमध्ये कॉमन फॅक्टर आहे . फार अपवादात्मक वक्रोक्ती येते. मीटर मध्ये लिहिताना प्रत्येक वेळेला अभूतपूर्व काही असे निर्माण होते ही एक फार मोठी चुकीची समजूत आहे हे या तिघा कवींच्यामुळे कळते . मात्र या तिघांनीही त्यांच्या काळाचा विचार करता फार पुढची कविता लिहिली. विशेषतः आशयाच्या संदर्भात त्याबद्दल शंका असू नये. तिघांनाही समाजाचे प्रबोधन होणे आवश्यक वाटत होते आणि हाही एक कॉमन फॅक्टर आहे . एका अर्थाने तिघांच्याकडेही एक सामाजिक बांधिलकी होती यातील केशवसुत फार क्रांतिकारक जगले नाहीत परंतु ज्योतिबा फुले आणि पठ्ठे बापूराव हे मात्र अफलातून क्रांतिकारक आयुष्य जगले याबद्दल शंका नाही . आपल्या आयुष्यातील आलेल्या स्त्रीला मूल होत नाही म्हणून तू सवता आन असे म्हणणारे ज्योतिबा फुले आणि ब्राह्मण आणि महार अशा दोन टोकांच्यावर जन्मलेले असूनही पवळाच्या प्रेमात पडणारे तिच्यासाठी महार होणे पत्करणारे आणि पुढे जाऊन पुरुषसत्ताक समाजामध्ये पवळाची अफेयर झाली तरी तिला तितक्याच पुन्हा प्रेमाने स्वीकारणारे पठ्ठे बापूराव हे काळाच्या मानाने फारच पुढे गेलेले होते आश्चर्यकारकरित्या आपण त्या काळातल्या मराठी समाजाचा विशेषता बहुजन मराठी समाजाचा विचार केला तर दिसते असे की या पठ्ठे बापूराव पवळा जोडीला निव्वळ पाहण्यासाठी सुद्धा लोक येत होते म्हणजे खरोखरच आंतरजातीय अंतर वर्णीय विवाहावर बहुजन समाजाकडून बहिष्कार टाकला जात होता का असा एक मोठाच पेच उभा राहतो पोलीस स्टेशनमध्ये पवळा जेव्हा गेली तेव्हा अस्पृश्यता पाळली गेली होती का असाही प्रश्न निर्माण होतो . त्या काळातले समाज वास्तव जसे आपल्यापुढे सादर केले जाते तसे ते होते का हा प्रश्न या दोघांच्या आयुष्याच्या संदर्भात अधिकच तीव्रपणाने उभा राहतो . ही प्रेम कहानी जितकी सरळ वाटते तितकी ती नाही तिच्यात सामाजिक जीवनाचे विशेषता मराठी बहुजन सामाजिक शैव समाजाचे अनेक पेच लपलेले आहेत . मराठीतील अर्वाचीन कवितेचे तीन पायोनियर त्यातील दोन शैव आहेत हा केवळ योगायोग नाही प्राचीन बद्दल मी आधीच बोललेलो आहे . असो.


माझा त्यांना म्हणजे पवळा आणि पठ्ठे बापूराव या दोघांनाही मानाचा मुजरा ! 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे