शैव आणि वटपौर्णिमा श्रीधर तिळवे नाईक 

माझ्या गावाचे नाव बांदिवडे त्याचा अर्थच वडांनी बांदी केलेले म्हणजे वेढले गेलेलं किंवा वडांची (वैज्ञानिक नाव फिकस वा फायकस मायक्रोकार्प ) तटबंदी असलेलं गाव ! साहजिकच गावात वड भरपूर होते हळूहळू काही अतिशहाण्यांनी ते कापायला सुरवात केली मात्र माझे वडप्रेम पुढेही कमी झाले नाही संपूर्ण ब्रह्मांडाचा पसारा वडाप्रमाणे आहे ही शैव कल्पना त्याला शह म्हणून बौद्धानी बोधी तर वैष्णवांनी अश्वत्थ ह्या नावाने पिंपळ वृक्ष आणला गीतेत श्रीकृष्णाने वृक्षांच्यात मी अश्वथ असे सांगितले आहेच 

शैव आणि आर्य संस्कृतीतील हा वृक्षसंघर्ष हा त्यांच्या संस्कृती संघर्षाशी साजेसा आहे पुढे जेव्हा शैवांचे वडप्रेम कमी होईना तेव्हा ह्या वडाशी जी ऍडजस्टमेन्ट झाली त्यातून आत्ताची हिंदू सावित्रीक वटपौर्णिमा जन्मली जे बाहेरून पराभूत करता येत नाही ते स्वतःत सामावून घेऊन त्याचे देशीकरण करून गिळून टाकायचे ही आर्यांची सांस्कृतिक प्रथा आहे देशीवाद हे त्यासाठी शोधलेले आर्यांचे प्राचीन हत्यार आहे जे प्रत्येक गोष्टीचे आर्यीकरण करण्यात त्यांना मदत करते 

वडपौर्णिमेचे मूळ हे मुळात आकारलिंगात आहे भगवान शंकरानी 

१ महालिंग (हल्ली ह्यालाच शिवलिंग म्हंटले जाते)

२ शिवलिंग ह्यात प्रामुख्याने उभा आकार महत्वाचा असतो 

३ शक्तिलिंग ह्यात आडवा आकार महत्वाचा असतो तो गोलाकार किंवा रेषीय असा दोन्ही असू शकतो 

४ इष्टलिंग हे मोक्षकांनी व नव्याने शैव धम्म स्वीकारलेल्यांनी गळ्यात घालायचे असते जे जन्मानेच शैव आहेत त्यांनी ते घालण्याची आवश्यकता नाही 

५ आकारलिंग ह्यात निसर्गाने निर्माण केलेल्या लिंगाकारांचा समावेश होतो 

अशी पंचलिंगे दिलेत त्यातील ज्यांचा आकार लिंगासारखा आहे त्यांची पूजा आकारलिंग म्हणून मान्य केली आहे ह्यात प्रामुख्याने डोंगर व वृक्ष हे शिवलिंग म्हणून तर नदी शक्तिलिंग म्हणून येतात एका अर्थाने आदिवासींच्या डोंगरपूजेला , वृक्षपूजेला व नदीपुजेला हा शैव धम्माने दिलेला नवा आकार आहे आणि भक्तिमार्गाने ज्यांना मोक्ष प्राप्त करायचा आहे त्यांच्यासाठी लिंगपूजा सुचवली आहे 

वडाचे दोन प्रकार असतात 

१ पारा असलेला वड ह्या वडाजवळ वड म्हणून शिवलिंग व पारा म्हणून पार्वतीरूपात शक्तीचा वास असतो म्हणूनच त्याला पारा म्हणतात आणि इथे गावाचे सर्व निर्णय पारावर बसून शिवशक्तीच्या साक्षीने घेतले जातात हे मिटिंगस्थळ आहे आणि इथं होणारे निर्णय हे शैवांनी मान्य करायचे असतात प्राचीन काळी गावाची पंचायत इथेच भरत असे पुढे शैव रसदर्शनातल्या काहींनी (अय्यारी वा अल्केमिस्ट )मर्क्युरीलाच पारा समजून भरपूर प्रयोग केले जे चुकीचे होते असे आता विज्ञान सांगते 

२ पारा नसलेला वड ह्या वडाची पूजा शिवलिंग म्हणून होते 

प्राचीनकाळी स्त्रिया ह्या वडाची पूजा सृजनाचा व ब्रह्मांडाचा मुख्य सोर्स शिव असल्याने शिवाचे प्रतीक म्हणून करत ही पावसाप्रती आत्ताच्या भाषेत मान्सूनप्रती तो आला म्हणून व्यक्त केलेली कृतज्ञता असे शैवांचा पावसाचा देवही शिव असल्याने हे स्वाभाविक होते वैदिकांचा पावसाचा देव इंद्र असल्याने ते यज्ञ करून पावसाला सलामी देत व तेही कृतज्ञता म्हणून योग्यच होते 

मूळ प्रथेनुसार पारा असलेला वडच पूजला जाई आणि ही वडपौर्णिमा हा संपूर्ण गावाचा विश्वास असे स्त्री ही सृजनशील मुलांना जन्म देणारी असल्याने तिनेच पावसाची पूजा करणे हे योग्य आहे असे मानले जाई म्हणून ह्या पूजा बायका करत व हा उत्सव बायकांचा मानला जाई 

ह्यात मग सावित्रीसत्यवान घुसली कुठं ? तर ज्या आर्यांनी वैदिक धर्माचा त्याग केला व शैव पूजा स्वीकारली त्यांना हा उत्सव इंटरेस्टिंग वाटला आणि त्याला स्वतःची आर्यन मिती जोडणे आवश्यक वाटले आर्यांचे मृत्यूवर विजय मिळवण्याचे स्वप्न , पुनर्जन्माचा सिद्धांत बायकांच्यावर ठसवण्याची युक्ती आणि सात जन्मात एकच पती मागितला तर सिद्ध होणारी पतिनिष्ठा ह्या तिन्हींचा संगम त्यांनी कुशलतेनं ह्या काल्पनिक कथेत केला पुढे जेव्हा काही शैवांनी भगवान शंकरांचा त्याग करून वैष्णव धर्म स्वीकारला तेव्हा त्यांनी आपली मूळ मुळे छाटून ही कथा स्वीकारली आणि आज हीच कथा वैष्णव व हिंदू वैष्णवांची मूळ कथा व मूळ श्रद्धा बनलेली दिसते 

अलीकडे ह्याची दोन स्पष्टीकरणे धुमाकूळ घालतायत 

एक हिंदुत्ववादी स्पष्टीकरण आहे ज्याच्या मते १२ वर्षे म्हणजे एक जन्म व सात जन्म म्हणजे ८४ म्हणजे १६ व्या वर्षी लग्न झाले तर सात जन्म हाच पती म्हणजे शंभर वर्षे हाच पती मिळो अशी ही मागणी आहे वास्तविक शैवांच्यात १२ वर्षे म्हणजे १ तप होय १ जन्म न्हवे पण सोयीनुसार फिरवाफिरव करणे ही आर्यांची सवय असल्याने ही फिरवाफिरव आलेली आहे 

दुसरे देशीवादी स्पष्टीकरण आहे उत्तराधुनिकतेने प्रबोधनाच्या केंद्रस्थानी पुरोगामी लोकांनी ठेवलेली रिझन बुद्धी नाकारली व बुद्धिवादी तर्क अमानुष जंगलतोडीचं समर्थन करत असल्याने आता पर्यावरणाची रक्षा श्रद्धाच करू शकते असा स्टॅन्ड घेतला ह्या स्टॅन्डनुसार देशीवादी वृक्षपूजा ही पर्यावरणाचं रक्षण करत असल्याने तिचे समर्थन करतात आदिवासी लोकांच्या श्रद्धाच आता जंगले व पर्यावरण वाचवतील ह्या श्रद्धेपोटी हे केलं जात आहे चिपको आंदोलनाने त्याला आधारही पुरवलेला आहे बायकांनी वृक्षांना मिठ्या मारून वृक्ष वाचवलेले आहेत 

प्रश्न असा आहे कि आता करायचं काय ? आर्यन ऍंगल पुरुषसत्तेचा प्रचार करत असल्याने स्वीकारता येत नाही हिंदुत्ववादी स्पष्टीकरण पुरुषसत्तावाद नाकारत नाहीये आणि देशीवादी ऍंगल पुरुषसत्तावादाचं काय करायचं हे न सांगताच त्याला पर्यावरणाचा अँगल जोडतोय 

ह्याला उपाय एकच आहे मूळ शैव अँगलचं नूतनीकरण ज्यात पुरुषसत्ताकवाद नाही उलट शिवशक्ती समानता आहे आणि ह्यासाठी का होईना पण वड व जंगल जिवंत ठेवले पाहिजेत असा पर्यावरण प्रचारही करता येईल शिवाय नूतनीकरणात स्त्रियांबरोबर पुरुषांनाही फेरे मारण्यात सामील करून घ्यावे म्हणजे हा उत्सव दोघांचाही होईल मानवजातीच्या निर्माणतेत स्त्रीचा वाटा ९० टक्के व पुरुषाचा फक्त १० टक्के आहे हे ह्यावेळी बिंबवावे म्हणजे स्त्रीपुरुष समानतेच्या बाजूने काही पावले पडतील माझ्या बालपणी माझी आई एकदा मला सोबत घेऊन गेली होती आणि फेरे मारताना मला मजा आली होती त्यामुळे स्वतःच्या मुलांना सोबत घेऊन फेरे मारले तर त्यांनाही ह्याची प्रॅक्टिस होऊन जाईल 

आणि आता जे रॅशनल आहेत त्यांचे काय ? तर त्यांनी झाडे वाचतील तर ऑक्सिजन मिळेल व पाऊसही पडेल श्वास आणि पाणी ह्या दोन मूलभूत गरजा फक्त झाडांच्यामुळेच भागातील हे आपल्या मुलांच्यावर व भवतालच्या माणसांच्यावर ठसवत राहावे उगाच वडाभोवती एकाच दिवशी गर्दी करण्यापेक्षा हा रॅशनल पर्याय केव्हाही अधिक चांगला आहे . 

शेवटी अनेक मेथड्सननी एकमेकाला पूरक ठरवत पर्यावरण वाचवणे व पर्यावरण वाचणे सर्वात महत्वाचे ! 

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे